

पिंपरी: पवना धरण सध्या १०० टक्के भरल्याने पवना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पवनेचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या काही भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना पालिका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर तसेच मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पवना धरण १०० टक्के भरले असून, नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरातील रावेत-पुनावळे बंधारा पाण्याखाली गेला आहे.
पिंपरी झुलेलाल घाटाजवळील वसाहतीत पवना नदीचे पाणी शिरले होते; तसेच चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी मंदिरात पवनेचे पाणी शिरल्याने शनिवार (दि. २५) दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.
थेरगाव येथील श्री केजुदेवी मंदिर पाण्याखाली गेले. नदीघाटावरील रहिवाशांना पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे; तसेच पालिकेची आपत्कालीन यंत्रणाही सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेले दोन दिवस शहर परिसरात पावसाच्या सरी कोसळत असून, अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.