कामशेत : कामशेत व नाणे मावळ परिसरात अल्पवयीन वाहनचालक सुसाट वाहने चालवत असून, दिवसेंदिवस अल्पवयीन वाहनचालकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अपघातांच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. यामध्ये पालक बेफिकीर असल्याचे दिसत आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिस व महाविद्यालयांनी प्रबोधन करण्याची गरज आहे.
कर्ण कर्कश हॉर्न वाजविल्याने ध्वनी प्रदूषणात वाढ
त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलीसुद्धा ट्रिपल सीट सर्रासपणे दुचाकी वाहने चालवत आहेत. अनेक अल्पवयीन मुली व मुलांना वाहन चालविता येत नाही. तरीही ते भरधाव वेगाने वाहन चालवत असतात. आपण शंभरच्या स्पीडने वाहन चालवू शकतो, असे अभिमानाने ते सांगतात. त्याचबरोबर कर्कश हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करतात.
अनेक जण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. वाहन चालवण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय परवाना मिळत नाही. परवाना नसतानाही वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. हा नियम पालकांना माहिती असूनही अनेकदा मुलांच्या हाती पालक स्वतःच वाहन देतात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहन चालविणार्या अल्पवयीन मुले आणि त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पालकांवर कारवाई करण्याची मागणी
अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी देतात. तर, काही मुले दुचाकीचा आग्रह धरतात. यातूनच अल्पवयीन दुचाकी चालवणार्यांची संख्या वाढत आहे. तर, काही कुटुंबातील मुलांच्या हाती अनेकदा चारचाकी वाहनेही पाहायला मिळतात.
एक प्रकारे पालक वाहन चालविणयास प्रोत्साहन देत असल्यामुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे. अशा अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यापेक्षा पालकांवर पोलिस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.