

सांगवी: सध्या उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. या वाढत्या उष्णतेचा थेट फटका रहाटणी येथील मुख्य उपकेंद्राच्या ट्रान्सफॉर्मरला बसत असून, यंत्रणा ओव्हरलोड झाली आहे. संभाव्य तांत्रिक बिघाड आणि अंधार टाळण्यासाठी महावितरणाने नागरिकांना वीज काटकसरीने वापरण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
15 वर्षे जुन्या केबल्सचा अडथळा
सांगवी परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील 15 वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या विद्युत केबल्स. महत्त्वाचे म्हणजे, शहरात सिमेंटचे रस्ते बनवताना जमिनीखालील केबल्सचा गांभीर्याने विचार करण्यात आला नाही.
सिमेंटच्या थराखाली गाडल्या गेलेल्या या जुन्या केबल्समध्ये जेव्हा फॉल्ट होतो, तेव्हा ते शोधणे महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. या तांत्रिक अडचणीमुळेच शितोळेनगर आणि मधुबन सोसायटीसारख्या भागात नागरिकांना तासनतास अंधारात राहावे लागत आहे.
शितोळेनगरमध्ये नवीन केबलचे काम प्रगतीपथावर
काही दिवसांपूर्वी शितोळेनगर आणि मधुबन सोसायटीत वीज गायब झाल्याचे वृत्त दैनिक पुढारीत प्रसिद्ध होताच महावितरणने तत्परता दाखवली आहे. येथील जुन्या आणि कमकुवत झालेल्या केबल्स बदलण्याचे काम सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून, हे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, केवळ एका भागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण सांगवीतील जुन्या केबल्सचे सर्वेक्षण करून त्या बदलण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाला नागरिकांचे आवाहन
महावितरणने नागरिकांना वीज वाचवण्याचे आवाहन केले असले तरी, दुसरीकडे प्रशासनानेही आपली जबाबदारी ओळखावी. सिमेंट रस्त्यांमुळे उद्भवणारी फॉल्टची समस्या आणि जुन्या केबल्सचे जाळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. यंत्रणा सक्षम केल्यास उन्हाळ्यात होणारी होरपळ थांबवता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वाढत्या उन्हामुळे ट्रान्सफॉर्मरवर प्रचंड भार येत आहे. तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि विजेचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.