

लोणावळा: पर्यटनवाढीसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासोबतच शहरातील महत्त्वाचे रखडलेले प्रकल्प येत्या काळामध्ये पूर्णत्वास नेण्याचा मानस लोणावळा नगर परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, सर्व समित्यांच्या सभापती व नगरसेवक, नगरसेविका यांच्या वतीने पत्रकार परिषद घेत मागील साडेपाच महिन्यांच्या कालावधीमध्ये लोणावळा शहरामध्ये झालेली विकासकामे व पुढील काळामध्ये होणारी कामे यांचा आढावा जनतेसमोर मांडला.
लोणावळा शहरांमधील अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामातील सर्व तांत्रिक अडथळे दूर करण्यात आले असून, पुढील सहा ते आठ महिन्यांमध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करू, असा विश्वास नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष देविदास कडू यांनी व्यक्त केला आहे. रेल्वे उड्डाण पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, देविदास कडू हे स्वतः या कामावर लक्ष ठेवून आहेत.
2019 साली या रेल्वे उड्डाण पुलाच्या पुढच्या कामाला सुरुवात झाली, त्या वेळी तत्कालीन पदाधिकारी व प्रशासन यांनी जागा भूसंपादन करण्याचा कोणताही विषय मार्गे न लावल्यामुळे पुढे जाऊन हे काम रखडले होते. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून या कामामधील सर्व तांत्रिक अडथळे व भूसंपादनाचे विषय मार्गी लावण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होणार असल्यामुळे कामाचा वेग सध्या कमी राहील, मात्र सात ते आठ महिन्यांमध्ये या पुलाचे काम पूर्ण करत तो वाहतुकीसाठी खुला करू व नागरिकांना रेल्वे गेटच्या समस्येतून सुटकारा मिळवून देऊ, असा विश्वास या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.
लोणावळा शहरातील विकासकामांचा आढावा नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी घेतला. वळवण महाविद्यालयासमोर एक्स्प्रेसवेच्या पुलाखाली गार्डन विकसित व सुशोभीकरण केले जाणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी नमो उद्यान या योजनेअंतर्गत जाखमाता उद्यानाचे सुशोभीकरण केले जाणार असल्याची माहिती नगरसेविका अनिता अंभोरे यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भातील माहिती नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी दिली. महिला व बालकल्याण समिती सभापती स्वप्ना कदम यांनी महिला व मुलींसाठी घेण्यात येणाऱ्या विविध कोर्सेसची माहिती दिली.
या स्थळांचा होणार विकास
खंडाळा तलाव व त्या परिसराचा पर्यटनात्मकदृष्ट्या विकास केला जाणार आहे. या ठिकाणी पसाट पद्धतीच्या लाईट्स लावल्या जाणार आहेत; तसेच स्वच्छतागृह, एसटीपी ही कामे केली जाणार असल्याची माहिती खंडाळ्याचे नगरसेवक जीवन गायकवाड यांनी दिली. त्या ठिकाणी वाहनतळासाठीदेखील जागा उपलब्ध केली जाणार आहे. वलवन तलाव यालादेखील पर्यटनात्मक दृष्ट्या सुशोभित केले जाणार आहे. यासाठी आठ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. येथे बोटिंग सुरू करण्याचा लोणावळा नगर परिषदेचा मानस आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे आले असून, विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर या कामाच्या लोकार्पण केले जाणार आहे. नगर परिषद इमारतीसमोर महात्मा फुले भाजी मार्केट इमारतीचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 65 ते 70 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. नगर परिषदेच्या इमारतीमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.