

वल्लभनगर: एकीकडे शहरातील अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने ती वेळेवर स्वच्छ केली जात नाहीत. परिणामी दुर्गंधी, अस्वच्छता आणि गैरसोयीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कासारवाडी येथील कचरा संकलन केंद्राजवळ महापालिकेची गाडी स्वच्छतागृह साफ करणाऱ्या वाहनातील पाण्याने भररस्त्यात धुतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, महापालिकेच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कासारवाडी येथील कचरा संकलन केंद्राजवळ महापालिकेची एक चारचाकी गाडी उभी करून होजपाईपद्वारे तिची धुलाई केली जात असल्याचे छायाचित्रांमधून दिसून येते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या धुलाईसाठी वापरण्यात आलेले पाणी स्वच्छतागृह साफ करणाऱ्या वाहनातून घेतले जात होते. त्यामुळे स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या संसाधनांचा अशा प्रकारे वापर होत असल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रस्त्यावर पाणीच पाणी
विशेष म्हणजे महापालिकेकडे वाहन धुण्यासाठी स्वतंत्र व्हेईकल वॉशिंग सेंटर उपलब्ध असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांनी मुख्य रस्त्यावरच वाहन धुण्याचा प्रकार केल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. अशा प्रकारामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याचीही शक्यता नागरिकांनी व्यक्त केली.
पाण्याची नासाडी
महापालिका सातत्याने नागरिकांना स्वच्छता राखण्याचे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करू नये. तसेच, पाण्याची नासाडी टाळण्याचे आवाहन करत असते. मात्र, त्याच पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून भररस्त्यात वाहन धुणे आणि स्वच्छतागृह साफ करणाऱ्या वाहनातील पाण्याचा वापर केल्याचा आरोप होत असल्याने लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
दोषींवर कारवाइची मागणी
या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि सार्वजनिक रस्त्यांवर वाहने धुण्याच्या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.