

पिंपरी : हिंजवडी आयटी हबमधील रस्ते अतिक्रमण, वाहतूक कोंडीने ग्रासले होते. परिणामी आयटीयन्सना तासन्तास कोंडीत अडकून पडावे लागत होते. दरम्यान, गेल्या दीड महिन्यात प्रमुख तीन चौकालगतची अतिक्रमणे हटवल्यानंतर या चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. या चौकालगतची जवळपास बाराशेहून अधिक अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत; तसेच दहा रस्त्यांचे सर्व्हेक्षण सुरू आहे. (Pimpari chinchwad News)
आयटी पार्कमधील नागरी समस्या, वाहतूक कोंडी यामुळे येथील कंपन्या त्रासल्या होत्या. नवीन कंपन्यांनी निराशा व्यक्त केली होती. तर, कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा विचार सुरू होता. याची दखल घेत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीत दोनवेळा समस्यांचा आढावा घेतला. या वेळी पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यासह स्थानिक ग्रामपंचायत यांनादेखील सूचना केल्या होत्या. तसेच, सिंगल पॉईंट ऑथरिटीचे तयार करण्यात आली असून, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त हे अध्यक्ष आहेत. त्यानुसार सर्वच विभाग कामाला लागेल होते.
दरम्यान, हिंजवडीचा सर्वाधिक परिसर हा एमआयडीसी अंतर्गत येतो. तर, या ठिकाणी पीएमआरडीएच्या वतीने मेट्रो आणि रस्त्याचे जाळे उभारण्यात येणार होते. याच धर्तीवर पीएमआरडीएला सिंगल पॉईंट को ऑर्डिनेटर म्हणून नेमण्यात आले होते. पुढे येथील सहा रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान, रस्तारुंदीकरण, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि बेशिस्त वाहनांना आळा बसावा यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तब्बल दहा रस्त्यावर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. त्यातील सर्वाधिक रस्ते हे आयटी हबमधील असल्याने सलग दीड महिने ही कारवाई सुरु होती. यात सर्वाधिक लक्ष्मी चौक ते मारुंजी या दरम्यान अतिक्रमणे आणि कच्ची, पक्की अशी 310 बांधकामे हटविण्यात आली आहेत.
आयटी हबमधील होणारी कोंडी, आयटीयन्सना होणारा त्रास लक्षात घेता प्रत्येक चौकातील अडथळे, कोंडी याचे विश्लेषण करण्यात आले होते. तसेच, काही नेमक्या बाबी प्रशासनास निदर्शनास आणून दिल्या होत्या. दरम्यान, यापैकी अनेक अडथळे प्रशासनाने दूर केले आहेत. त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एमाअयडीसी शेड, मधुबन हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी चौक आणि पाईड रोड ते विप्रो सर्कल या चौकांचा समावेश आहे.
हिंजवडी, मारुंजी परिसरात रस्ते प्रस्तावित आहेत. त्या अनुषंगाने सर्व्हेक्षण, सुनावणी कारवाई सुरु आहे. या ठिकाणी रस्त्यावर अडथळे येणारे व कोंडीच्या कारणांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे चौकातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे.
डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील, सहआयुक्त, पीएमआरडीए