

पिंपरी: किचकट गुन्ह्याच्या छडा लावत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अवघ्या चार दिवसात तब्बल 4 हजार किलोमीटरचा प्रवास करून चार आरोपींना अटक केली. धाराशिव, लातूर आणि राजस्थानमधील जयपूर व भिलवाडा येथे सापळे रचून ही कारवाई करण्यात आली.
या आरोपींनी बनावट शेअर ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून नागरिकांची 71 लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असून, आंतरराष्ट्रीय आर्थिक साखळीचेही धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे. (Latest Pimpri News)
या फसवणुकीची सुरुवात फिर्यादीस Whats-pp 'SMC Global Securities' या नावाने सामील करून करण्यात आली. त्यानंतर Aurora Max' या बनावट ट्रेडिंग अॅपवर गुंतवणुकीचं आमिष दाखवण्यात आलं.
सातत्याने नफा मिळवून देण्याचं आश्वासन देत त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल 71 लाख रुपये उकळण्यात आले. यावरून रितु व्होरा, हरीश सिंग, अजय गर्ग आणि अन्य अज्ञातांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान एक महत्त्वाचा धागा मिळाला. आयडीएफसी बँकेच्या एका खात्यावर दोन दिवसांत तब्बल 3.25 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचा तपास करताना पोलिसांना हे खाते धाराशिव येथील अलफहाद आरिफ मोमीन (27, रा. मिल्ली कॉलनी) यांच्या नावे असल्याचे आढळले. पोलिसांनी त्वरित धाराशिवला धाव घेत अलफहादला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हे खाते अजय ऊर्फ शिवप्रसाद मलिकार्जुन खुदासे (39, रा. लातूर) यांच्या सांगण्यावरून उघडल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांचे पथक लातूर येथे गेले आणि खुदासेला ताब्यात घेतले. चौकशीत खुदासेने सांगितले की, संबंधित खाते सुर्या ऊर्फ राहुलसिंग कर्णावत (रा. झुझुनू, राजस्थान) याच्या हवाली केले होते. या माहितीच्या आधारे पथकाने जयपूर शहरात पोहोचून कौशल्याने सापळा रचून राहुलसिंगला अटक केली.
दरम्यान, राहुलसिंगने हा संपूर्ण गुन्हा प्रेमशंकर बलदेव बैरागी (रा. भिलवाडा, राजस्थान) याच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ भिलवाडा येथे धाव घेत प्रेमशंकरलाही अटक केली. या आरोपींनी व्हाट्स अपच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून फसवणुकीसाठी वापरण्यासाठी बँक खाती उघडून घेतली होती. विशेष म्हणजे आरोपी चायनीज व कंबोडियातील व्यक्तींशी थेट संपर्कात होते.
या गुन्ह्याचा तपास करताना सायबर पोलिसांनी चार दिवसांत पिंपरी-चिंचवडपासून धाराशिव, लातूर, जयपूर आणि भिलवाडा असा एकूण चार हजार किलोमीटरचा प्रवास करून ही गुन्हेगारांची साखळी उघडकीस आणली.
यांनी केली कामगिरी
पोलिस आयुक्त विनायक चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, विद्या पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.