Chakan residents protest towing vehicle
चाकण: चाकण पालिकेच्या अर्धवट कामाचा फटका शहरवासीयांना बसत आहे. पार्किंगची सोय नसताना सम-विषम पर्किंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर टोइंग कारवाई सुरू आहे. दुसरीकडे मात्र पार्किंगची सोय केली जात नाही. त्यामुळे चाकणमध्ये नागरिकांकडून टोइंग कारवाईबाबत संताप व्यक्त केला जात आहे. त्यातूनच नागरिकांनी शुक्रवारी (दि. 1) टोइंग वाहनाला घेराव घालत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.
चाकणमधील महात्मा फुले चौक येथे आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिरासाठी नागरिक एकत्र आले होते. या ठिकाणी अचानक आलेल्या टोइंग वाहनाने येथील अनेक वाहने उचलून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी हे वाहन अडवले. या वेळी अधिकारी व नागरिकांत जोरदार वाद झाला. त्यानंतर दांडगाई करून उचललेली सर्व वाहने पुन्हा मूळ मालकांना जागेवर परत करण्यात आली. (Latest Pimpri News)
दरम्यान, याबाबत वरिष्ठ पोलिस प्रशासनाला निवेदने देऊन सदरची कारवाई थांबवण्याची विनंती करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
नागरिकांचे आक्षेप काय?
चाकण शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र, ही कारवाई केवळ दुचाकींवरच होते. चारचाकी वाहनांना सूट दिली जाते.शहरात बेशिस्त वाहने पार्क करणार्या चालकांना दणका देण्यात आला.
मात्र, महामार्गावर आणि चाकण औद्योगिक भागात अशा कारवाया होत नाहीत. केवळ चाकण शहरातील व्यापार उधळून लावण्यासाठी कारवाया होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. चाकण शहरात वाहनतळांची कसलीच व्यवस्था नाही. रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहेत. असे असताना टोइंग कारवाई सुरू आहे. त्यामुळे पार्किंगची सोय करण्याऐवजी टोइंगलाच प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत आहे.
जागेअभावी प्रश्न कायम
शहरातील रस्त्यालगत अनेक चालक बेशिस्तपणे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. नागरिकांकडून शहरात वाहनतळ उपलब्ध करण्याची मागणी केली जाते. मात्र, जागेअभावी हा प्रश्न कायम आहे. अनेक ठिकाणी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. दरम्यान, वाहने उचलल्यानंतर कारवाया टाळण्यासाठी अन्य उलाढाली होत असल्याचा अनेकांचा आरोप आहे.