पिंपरी: अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी रस्ते विकसित न झाल्यास तेथे पुन्हा अतिक्रमण वाढते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून अतिक्रमण काढल्यानंतर तातडीने रस्ते विकसित करण्याच्या द़ृष्टीने पाठपुरावा करा; तसेच कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या द़ृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयातील बैठकीत दिले.
चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार (दि. 8) सकाळी पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, या वेळी ते बोलत होते. चाकणसह परिसरात येणार्या अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी होते. (Latest Pune News)
त्यामुळे अशा वाहनांवर ठरावीक वेळेची बंधने घालत एमआयडीसी भागात ट्रक टर्मिनल सुरू करण्यावर भर देत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आरटीओ यांच्यासह पोलिस यंत्रणेने संयुक्तपणे नियोजन करणे अपेक्षित आहे.
यासह कचर्याची समस्या निकाली काढत या भागातील अतिक्रमणे तातडीने काढावीत, रस्ते विकसित करताना जर कोणी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल, यासंदर्भात उपाययोजनांची माहिती, त्याचे कालबद्ध टप्पे व मास्टर प्लानचे सादरीकरण केले.
बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एमआयडीसी भागात पाहणी
चाकणसह एमआयडीसी भागातील नागरी समस्या व वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली. तसेच, भारत माता चौक मोशी, समृद्धी पेट्रोल पंप सॅनी कंपनी नाणेकरवाडी, बंगलावस्ती मेदनकरवाडी - सासे फाटा, चाकण चौक, आंबेठाण चौक, चाकण चौक ते कडचीवाडी, हिंगणे चौक खराबवाडी, म्हाळुंगे पोलिस चौकी एमआयडीसी रस्ता आदी भागात पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
चारपदरी मार्ग अजिबात नको
वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी चाकणमध्ये चार पदरी उड्डाण पुलास मंजुरी दिली होती. वाढत्या औद्योगिक वसाहत, वाहनांची गर्दी यामुळे सहा पदरी उड्डाणपूल मार्ग व जमिनीवर सहा पदरी रस्ता होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघेल, असे स्पष्टीकरण पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. या वेळी आंबेठाण चौकात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणते नवीन मार्ग आहेत. कोणते नव्याने करता येतील, याबाबत संबंधित अधिकार्यांना त्यांनी सूचना केल्या.