

जगन्नाथ काळे
तळेगाव स्टेशन: तळेगाव-चाकण महामार्गावर आणि परिसरात वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी नगर परिषद आणि वाहतूक पोलिस अपयशी ठरत आहे. यामुळे तळेगाव परिसरातील महत्त्वाचे रहदारीचे रस्ते कधी मोकळा श्वास घेणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तळेगाव स्टेशन भागातील रेल्वे लोहमार्गावरील पूल अरुंद आहे. त्या पुलाच्या शेजारीच जुना पूल आहे. त्या पुलाची डागडुजी करून वापरात आणावा आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने त्या पुलावरून सोडली आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहने सध्याच्या पुलावरून सोडली, तर वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. (Latest Pimpri News)
तळेगाव रेल्वे स्टेशनकडे स्टेशन चौकातून जाणारे आणि यशवंतनगरकडून स्टेशनकडे जाणारे रस्ते अरुंद आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रिक्षा स्टँड नसल्याने रिक्षा रस्त्यातच लावल्या जातात. यामुळे स्टेशन चौकात आणि जनरल हॉस्पिटल गेट समोर वाहतूककोंडी नित्याची झाली आहे.
पुणे येथून लोणावळ्याकडे जाणार्या आणि लोणावळ्याकडून पुण्याकडे जाणार्या तसेच पुणे-तळेगाव -पुणे अशा सुमारे 36 रेल्वे लोकल फेर्यांची ये-जा सुरू आहे. अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वेचा थांबा तळेगाव स्टेशन येथे आहे. या रेल्वे आणि रेल्वे लोकलमधून प्रवासी तळेगाव स्टेशन येथे उतरणे आणि बसणे सतत सुरू असते.
प्रवाशांना स्टेशनवर सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी खासगी तसेच रिक्षावाले यांची मोठी गर्दी होते. यात अरुंद रस्त्यांमुळे रेल्वे गेली की या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. यामुळे वाहतूक पोलिस आणि तळेगाव नगर परिषदेने येथे नियोजन करणे गरजेचे आहे. या रोडवरील अतिक्रमणे हटवणे आवश्यक आहे.
महामार्गावरील अतिक्रमणे हटवा
तळेगाव-चाकण रोडवर भाजीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. भाजी खरेदी करणा-यांची वाहने रोडच्या कडेला उभा असतात. त्यांच्याकडून भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक आपली वाहने रस्त्यातच उभा करतात, यामुळे महामार्गावरील वाहतूककोंडी वाढली आहे. यामुळे महामार्गावर अनधिकृतपणे वाहन पार्क करणार्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
तळेगाव-चाकण महामार्गावर नगर, नाशिक, बीड आदी भागांतून मुंबईच्या दिशेने जाणारी-येणारी वाहने मोठ्या प्रमाणात असतात. लांब पल्ल्याची वाहने वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहनचालक तसेच स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. यामुळे येथील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- चंद्रकांत सावंत, सामाजिक कार्यकर्ते, तळेगाव.
कर्मचार्यांच्या ड्युटी 8 तासांची असते; परंतु वाहतूक कोंडीमुळे घरातून निघून परत येईपर्यंत 12 तास लागतात. यामुळे मनस्ताप होतो, असा त्रास रोज सहन करावा लागतो.
- कैलास मालपोटे, एमआयडीसी कामगार.
सतत पडणारा पाऊस, अरुंद रस्ते त्यावरील खड्डे, प्रत्येकांना इच्छित स्थळी जाण्याची घाई, यामुळेही वाहतूककोंडीत भर पडते. तरी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करावे.
- गणेश लोंढे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक