

संतोष शिंदे
पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: तळेगाव येथील किशोर आवारे यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच चिखली येथे गोळीबार करून एका तरुणाचा खून करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये सराईतांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिस रेकॉर्डवरील या गुन्हेगारांच्या हालचालींवर कोणाचाच 'वॉच' नसल्याचे अधोरेखित होत आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सन 2018 मध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. ज्यामुळे शहर परिसरात खाकीची वर्दळ वाढली. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस शहरातील कुख्यात टोळ्यांच्या मागे हात धुवून लागले. परिणामी गुन्हेगारी विश्वात दबदबा असणार्या टोळी प्रमुखांनी अक्षरशः नांग्या टाकल्या; मात्र तरीदेखील अल्पवयीन मुलांसह विशीतल्या तरुणांनी शहर कायम अशांत ठेवले. अलीकडे तर शहरात घडणार्या गंभीर गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सराईतांकडून होणार्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी एक आणि एकापेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सर्व गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. या रेकॉर्डनुसार जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारांचे पोलिसांनी खच्चीकरण करणे अपेक्षित होते; मात्र कारवाईच्या नावाखाली नुसतेच कागदी घोडे नाचवण्यात आले. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर म्हणावा असा वचक पोलिसांना ठेवता आला नसल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्यात श्रेलरश्र ळपींशश्रश्रळसशपलश र्लीीशर्री (ङखइ) पथक नियुक्त केले जाते. हद्दीत घडणार्या छोट्या मोठ्या घटनांची गोपनीय माहिती संकलित करण्याची जबाबदारी या पथकाची असते. तसेच, हद्दीतील गुन्हेगारांची इत्यंभूत माहिती आणि त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी र्र्ीीीींशळश्रश्ररपलश ींशरा तयार केली जाते. दरम्यानच्या काळात घडलेल्या खुनांचे प्लानिंग काही महिन्यांपासून सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गोपनीय यंत्रणा नेमकी करते काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सराईतांकडून होणारे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना राबवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक पोलिसाकडे एका गुन्हेगारांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दत्तक योजनेतील गुन्हेगार दररोजच्या दैनंदिन आयुष्यात काय करतो, उपजीविका कशी भागवतो, कोणासोबत उठबस करतो, याची माहिती संबंधित पोलिसाने ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. तत्कालीन पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी ही योजना राबवली होती; मात्र त्यांच्या बदलीनंतर ही योजना देखील बरगळल्याचे दिसून आले.
कट्ट्यांचा व्यापार ; विशेष पथकाची गरज
शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांमध्ये गावठी कट्ट्यांचा वापर होत असल्याचे समोर येत आहे. ओठावर मिसरूड न फुटलेल्या कोवळ्या पोरांनादेखील कट्टे सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शहरात कट्ट्यांचा व्यापार होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली होती. कट्ट्यांचे रॅकेट मुळासकट उखडून फेकण्यासाठी पथकाला त्या वेळी 'फ्री हॅन्ड' दिला होता. सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता पुन्हा अशा पथकाची गरज निर्माण झाली आहे.
गुन्हे शाखेच्या प्रत्येक युनिटकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जाते. त्यासाठी नियमितपणे वेगवेगळे टास्क दिले जातात. दररोज रात्री दीडशे ते दोनशे गुन्हेगार तपासले जातात. बाल गुन्हेगारांवरदेखील पोलिसांचा वॉच आहे.
– पद्माकर घनवट, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.