नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बँकांनी बेवारस खात्यांतील तब्बल 35 हजार कोटींची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे सोपवली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने मागील आठवड्यात संसदेला ही माहिती दिली. या रकमेवर कोणीही दावा करण्यासाठी पुढे आल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेला 35 हजार 12 कोटींची रक्कम सुपूर्द केली. या रकमेला कोणताही वारस नव्हता. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सर्वाधिक बेवारस संपत्ती ही भारतीय स्टेट बँकेतील आहे. एसबीआयमध्ये 8086 कोटी रुपयांची संपत्ती बेवारसपणे होती. तर पंजाब नॅशनल बँकेत 5340 कोटी रुपये, कॅनरा बँकेजवळ 4558 कोटी रुपये जमा बेवारस, कोणताही दावा नसणारी होती.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, बचत अथवा चालू खात्यातील रकमेवर 10 वर्षापर्यंत कोणीही दावा केला नसेल तर ती रक्कम बेवारस म्हणून गणली जाते. हे पैसे डिपॉझिटर एज्युकेशन अॅण्ड अवेअरनेस फंडफ मध्ये हस्तांतरीत केले जातात.