![संपूर्ण जगापुढे भारताचा आदर्श निर्माण करण्याचा संघाचा प्रयत्न : डॉ. मोहन भागवत](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F08%2F16-5-16.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून (आरएसएस) संपूर्ण जगापुढे भारताचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केले जात आहे. भारतीय समाजाच्या भल्यासाठी आणि भारताला एकसंध करण्याचे काम संघाकडून केले जात असल्याचे प्रतिपादन सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी केले.
भारतीय समाज जगासाठी आदर्शवत करण्यासाठीच सातत्याने संघाकडून काम केले जात असून संघाचा स्वंयसेवक कधीच वैयक्तिक हिताचा विचार करत नसल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. संघाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. संघाच्या स्वयंसेवकांकडून राबविल्या जात असलेल्या कल्याणकारी योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
ते म्हणाले, ज्यावेळी एकाच वातावरणात समाज एक मन आणि संकल्पाने उभा राहतो, त्याचवेळी त्याला वास्तविकरीत्या समाज म्हटले जाते. ज्याचा उद्देश एकच आहे, एकमेकांच्या मदतीसाठी लोक एकत्रित येतात, त्यालाच समाज म्हटले जाते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी समाजातील विविध वर्गांतील लोकांनी बलिदान दिलेे. अनेकांच्या योगदान आणि बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. आम्ही कधीच वैयक्तिक विचार करत नसून संपूर्ण समाजाचा विचार करतो. हीच भावना आम्हाला पुढे न्यायची असून आम्हा भारतीयांचा डीएनए आणि स्थायी स्वभाव एकच आहे.
संघाचा स्वंयसेवक कधीच व्यक्तिगत हिताकडे लक्ष देत नाही.ते नेहमीच समाजासाठी काम करत असतात आणि भविष्यातही करत राहतील. मी आणि माझे या भावनेला उभारी देण्याची गरज असून याचमुळे एकाच समाजाच्या विकासासाठी मदत होईल, असे डॉ. भागवत यांनी या वेळी नमूद केले.