माझे मित्र आबे सान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Shinzo Abe
Shinzo Abe
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अतिशय जवळचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे, यांचा शुक्रवारी एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. आपल्या या मित्राबद्दल मोदी यांनी एक भावपूर्ण ब्लॉग लिहिला. त्यातील हे संपादित अंश-

शिंझो आबे- जपानचे अद्वितीय नेते, जागतिक कीर्तीचे एक उत्तुंग मुत्सद्दी राजकारणी, भारत-जपान यांच्यातील मैत्रीचे महान शिल्पकार- आज आपल्यामध्ये नाहीत. जपान आणि जगानेही आज एक अत्यंत द्रष्टा नेता गमावला आणि, मी माझा एक अत्यंत प्रिय मित्र गमावला.
मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना, 2007 साली पहिल्यांदा शिंझो आबे यांना भेटलो. पहिल्या भेटीपासूनच, आमची मैत्री कार्यालयीन सोपस्कार आणि शिष्टाचारांचे अडथळे पार करुन त्यांच्या पलीकडे गेली.

क्योटोच्या तोजी मंदिरात आमची झालेली भेट, शिंकानसेन (ट्रेन) मधून आमचा एकत्रित प्रवास, अहमदाबादला साबरमती आश्रमास आम्ही दिलेली भेट, काशीमध्ये आम्ही दोघांनी मिळून केलेली गंगा आरती, टोक्योमधला भव्य चहा समारंभ… आमच्या दोघांच्या भेटीतल्या अशा असंख्य अविस्मरणीय क्षणांची यादी खरेच खूप मोठी आहे.

माऊंट फूजीच्या पायथ्याशी असलेल्या यामानाशी प्रांतातल्या त्यांच्या मूळगावी मला आमंत्रित करून, त्यांनी मला जो सन्मान दिला दिला होता, त्या आठवणी तर माझ्या मनात चिरकाल राहणार आहेत. 2007 ते 2012 या काळात, ते जपानचे पंतप्रधान नसतानाही, आणि अगदी अलीकडे, 2020 नंतरसुद्धा, माझे त्यांच्याशी असलेले स्नेहाचे घट्ट संबंध कायम दृढ राहिले.

आबे सान यांच्यासोबतची माझी प्रत्येक भेट वैचारिकदृष्ट्या मला अधिकाधिक समृद्ध करणारी होती. त्यांच्याकडे कायमच नवनवीन, अभिनव कल्पनांचा साठा असे. प्रशासन, अर्थव्यवस्था, संस्कृती, परराष्ट्र धोरण अशा कितीतरी विषयांवर त्यांच्याकडे मौल्यवान ज्ञान आणि दूरदृष्टी होती.

गुजरातसाठी मी आखलेल्या आर्थिक धोरणात, त्यांनी दिलेले सल्ले फार प्रेरक होते. गुजरात आणि जपान मध्ये अत्यंत चैतन्यमय भागीदारीचे संबंध निर्माण करण्यात, त्यांचा पाठिंबा अतिशय मोलाचा होता. नंतर भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक भागीदारीत अभूतपूर्व परिवर्तन घडवण्यासाठी, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. आधी दोन्ही देशांमध्ये असलेल्या, अत्यंत मर्यादित अशा द्वीपक्षीय संबंधांना आबे सान यांनी व्यापक आणि सर्वसमावेशक आयाम दिले. देशाच्या प्रत्येक क्षेत्राला ह्या संबंधांचा स्पर्श झाला, इतकेच नाही, तर दोन्ही देशांच्या तसेच या प्रदेशाच्या सुरक्षिततेसाठी हे संबंध अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांच्यासाठी, हे संबंध दोन देशांच्या आणि जगभरातल्या लोकांसाठीही अत्यंत परिणामकारक असे संबंध होते. भारतासोबत नागरी आण्विक कराराचा पाठपुरावा करण्याचा त्यांचा दृढनिश्चय होता – जो त्यांच्या देशासाठी अत्यंत कठीण होता. भारतातील हायस्पीड रेल्वेसाठी अत्यंत उदार अटीशर्ती निश्चित करण्यात, त्यांची भूमिका निर्णायक ठरली होती. स्वतंत्र भारताच्या वाटचालीतील महत्त्वाच्या या प्रवासात, जपान प्रत्येक पावलावर विकासाला गती देण्यासाठी भारतासोबत असेल, हे त्यांनीच सुनिश्चित केले.

भारत-जपान संबंधांमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊनच 2021मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जगातील विविध जटिल स्थित्यंतरांची आबे सान यांना अचूक माहिती होती. राजकारण, समाज, अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन काळाच्या पुढे राहण्याची त्यांची दूरदृष्टी होती, कोणती निवड करायची याचे ज्ञान होते. परिषदांच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील जनतेला, जगाला बरोबर घेऊन जाण्याची दुर्मीळ क्षमता त्यांच्याकडे होती. त्यांच्या दूरगामी धोरणांनी म्हणजेच 'आबेनोमिक्स'ने जपानी अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा दिली आणि तिथल्या लोकांमध्ये नवोन्मेष आणि उद्योजकतेची भावना प्रज्वलित केली.

बदलते वारे आणि संकट ओळखण्याची दूरदृष्टी ही त्यांना आपल्याला दिलेली सर्वात मोठी भेटवस्तू होय. संकटांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक नेतृत्व त्यांच्याकडे होते. इतरांच्या खूप आधी, त्यांनी 2007 मध्ये भारतीय संसदेतील आपल्या मुख्य भाषणात, समकालीन राजकीय, सामरिक आणि आर्थिक वास्तवाचा उल्लेख करताना या शतकात जगाला आकार देईल अशा हिंद-प्रशांत क्षेत्राच्या उदयाचा पाया रचला.

सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेबद्दल आदर राखणे, आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियमांचे पालन करणे, दृढ आर्थिक सहभागातून समानतेच्या भावनेने सामायिक समृद्धीसाठी शांततेने आंतरराष्ट्रीय संबंध जपणे ही त्यांची मूल्ये होती. या मूल्यांवर आधारित, स्थिर आणि सुरक्षित, शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्याची व्यवस्था उभारण्यात ते आघाडीवर होते.

क्वाड,आसियान नेतृत्वातील मंच,हिंद-प्रशांत महासागर उपक्रम,आशिया-आफ्रिका विकास कॉरिडॉर आणि आपत्तीरोधक पायाभूत सुविधांमध्ये त्यांच्या योगदानाचा मोठा फायदा झाला. देशांतर्गत संभ्रम आणि परदेशातून व्यक्त होणार्‍या संशयावर मात करून, त्यांनी संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात संरक्षण, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाबरोबरच जपानच्या धोरणात्मक सहभागामध्ये परिवर्तन घडवून आणले.

या वर्षी मे महिन्यात माझ्या जपान भेटीदरम्यान मला आबे सान यांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांनी नुकतेच जपान-भारत संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले होते.ते नेहमीप्रमाणे उत्साही, मनमोकळे, आणि अतिशय विनोदी होते. भारत-जपान मैत्री आणखी दृढ कशी करता येईल याविषयी त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना होत्या. त्या दिवशी मी त्यांचा निरोप घेतला तेव्हा ही आमची शेवटची भेट असेल याची मला कल्पनाही नव्हती. मी त्यांचा नेहमीच ऋणी राहीन आणि मला त्यांची खूप आठवण येईल!

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news