नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : जर विज्ञान, सरकार आणि समाजाने एकत्र येऊन काम केले तर त्याचे चांगले परिणाम येतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विविध पिकांच्या विशिष्ट प्रकारांनी विकसित केलेल्या 35 जाती त्यांनी मंगळवारी राष्ट्राला अर्पण केल्या. यावेळी ते बोलत होते.
वातावरण बदलाचे आव्हान तसेच कुपोषण दूर करण्याच्या उद्देशाने इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्चने (आयसीएआर) या 35 जाती विकसित केल्या आहेत. रायपूर येथे स्थापन केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक टॉलरन्स संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. शिवाय हरित परिसर पुरस्कारांचे वितरण त्यांनी केले. कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचेही मार्गदर्शन झाले.
पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी देशभरातील आयसीएआरच्या अखत्यारितील संस्था, राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारितील कृषी विद्यापीठे तसेच कृषी विज्ञान केंद्रांतील अधिकारी-कर्मचारी आणि शेतकर्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले.
पिकांचे नव्याने विकसित केलेले वाण असे आहेत की जे वातावरणाशी जुळवून घेतात. तसेच, त्यांच्यात जास्त पोषक तत्त्वे असतात, असे आयसीएमआरने सांगितले.
विकसित वाणांमध्ये दुष्काळी वातावरणाशी जुळवून घेणारा काबुली चना, पाने मुरडणे तसेच स्टेरिलिटी मोझॅक रोगापासून बचाव करणारा तूर, लवकर उत्पन्न देणारे सोयाबीन, विविध प्रकारच्या रोगांना प्रतिबंध करणारा भात, गव्हाच्या बायोफोर्टिफाईड जाती तसेच बाजरी,फवा बीन, कुट्टू, विंग्ड बीन, मका, किनुआ या पिकांचा समावेश आहे. मानवी तसेच पशुच्या आरोग्याला घातक असलेले अँटिन्यूट्रिशल तत्त्व सुधारित वाणांमध्ये नसल्याचा दावाही आयसीएमआरने केला आहे.