नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (23 एप्रिल) रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीला पुन्हा फटकारले. बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने वृत्तपत्रांतून जाहीर माफी मागितली खरी; पण हा माफीनामा आकाराने त्यांच्या मूळ जाहिरातींइतकाच होता का, जाहिरात जेवढी मोठी होती तेवढाच माफीनामा का नाही, असा सवाल न्यायालयाने केला.
सुनावणी दरम्यान बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 एप्रिल रोजी होणार आहे.
पतंजलीचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले की, पतंजलीने 67 वर्तमानपत्रांमध्ये जाहीर माफीची जाहिरात दिली, त्यावर लाखो रुपये खर्च केले. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांनी, तुम्ही प्रकाशित केलेल्या माफीनाम्याचा आकार तुमच्या जाहिरातींइतकाच आहे का, अशी विचारणा केली. माफीनाम्याची कात्रणे जशीच्या तशी न्यायालयात सादर करण्याचे आदेशही दिले.