नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा कोरोना महारोगराईमुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या कृषी गणनेला सुरुवात झाली आहे. दर पाच वर्षांनी देशात कृषी गणना केली जाते. ऑगस्ट 2022 पासून कृषी गणनेचे प्रत्यक्ष कार्य सुरू होईल, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. ऑपरेशनल होल्डिंगचा आकडा आणि क्षेत्र, त्यांचा आकार, वर्गवार वितरण, जमीन वापर, भाडेकरार आणि पीक पद्धतीसह इतर सूक्ष्म पातळीवर विविध कृषी मापदंडांवर माहिती मिळवण्यासाठी ही गणना केली जाते. यंदा कृषी गणनेचे डेटा संकलन प्रथमच स्मार्ट फोन आणि टॅबलेटवर केले जाईल. बहुतांश राज्यांनी त्यांच्या जमिनीची नोंदी आणि सर्वेक्षणासाठी डिजिटायझेशन केले आहे. कृषी गणनेच्या डेटाच्या संकलनाला त्यामुळे गती मिळेल.
भारतासारख्या विशाल आणि कृषिप्रधान देशात या गणनेमुळे मोठा फायदा होईल. केंद्र सरकारकडून शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यांच्या राहणीमानात परिवर्तन घडवण्याबरोबरच लहान शेतकर्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना संघटित करणे, त्यांना फायदेशीर पिकांकडे आकर्षित करणे आणि जागतिक मानकांच्या बरोबरीने उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी गणनेचा प्रारंभ करताना व्यक्त केले.