

Government Employee DA Hike: पश्चिम बंगालमध्ये इतिहास रचत भाजपने पहिल्यांदाच सत्ता मिळवली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तृणमूल काँग्रेसचे १५ वर्षाचे सरकार उलथवून लावलं. त्यानंतर शुभेदू सरकार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दरम्यान, नव्या सरकारमधील नवीन अर्थमंत्री स्वपन दासगुप्ता यांनी बजेट सादर करताना सरकारचे लक्ष्य हे विकसित भारत आणि विकसित बंगाल आहे असं सांगितलं. त्याचबरोबर सरकारने मोठी घोषणा करत आता सुरू असलेल्या सर्व सामाजिक योजनांमध्ये मोठा बदल करणार असल्याचं देखील सांगितलं.
भाषणादरम्यान, स्वपन दासगुप्ता यांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी बेट दिली. त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए भत्त्यात २० टक्क्यांची वाढ करत असल्याचं जाहीर करून टाकलं. याचबरोबर नवे सरकार हे युवकांसाठी १ लाख रोजगार निर्मिती करणार असल्याचं देखील सांगितलं. त्यात महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव असणार आहेत असं देखील त्यांनी जाहीर केलं.
अर्थ मंत्री दासगुप्ता यांनी स्पष्ट केलं की राज्यात सध्या सुरू असलेल्या आणि भविष्यातील सामाजिक योजना पुढेही सुरू राहणार आहे. सरकार पूर्णपणे पारदर्शकपणे काम करेल. राज्यात सुरक्षा - व्यवस्था मजबूत करण्यात येईल. तसेच राज्यात आपत्कालीन हेल्पलाईन सेवा डायल ११२ देखील सुरू करण्यात येणार आहे.
तांत्रिक विकासाला देखील चालना देण्यासाठी प्रशासकीय सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या उपक्रमांना गती देण्यात येईल. तसेत पश्चिम बंगालमध्ये आता आर्टिफिशल इंटेलिजेन्सवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. याचबरोबर राज्यात डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड देखील सुरू केलं जाणार आहे.
राज्याची सांस्कृती जपण्यासाठी कोलकात्यात एक नवीन सांस्कृतिक स्कूल देखील स्थापित केलं जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेत स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी आमदारांना मिळणाऱ्या एमएलए फंड ७० लाख रूपयांवरून थेट १ कोटी रूपये करण्यात येणार आहे.