UP Wedding news
आझमगड: नवरदेवाच्या जुन्या प्रेयसीने थेट पोलिसांना सोबत घेऊन लग्नाच्या मांडवात एन्ट्री घेतली आणि लग्न थांबवण्याची मागणी केली. मात्र, त्याआधीच विवाहाचे सर्व विधी पूर्ण झाले होते. पोलिसांना पाहताच नवविवाहित जोडप्याने मंडपातून पळ काढला, ज्यामुळे उपस्थित पाहुणे आणि वऱ्हाडी मंडळी अवाक झाली. या गोंधळात संतप्त वऱ्हाड्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात एका विवाहसोहळ्यात शुक्रवारी हा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
गडवाल गावातील रहिवासी असलेला आणि परदेशात नोकरी करणारा ब्रिजेश कुमार याचा विवाह ठरला होता. शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा सुरू होता. मात्र, फेरे सुरू असतानाच एक तरुणी पोलिसांना घेऊन तिथे आली. नवरदेवासोबत आपले गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असून त्याने लग्नाचे आमिष दाखवल्याचा आरोप तिने केला.
प्रेयसीच्या या दाव्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आणि लग्नाच्या आनंदावर विरजण पडले. प्रकरण इतके चिघळले की, लग्नघरातील काही लोकांनी थेट पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत तक्रारदार तरुणीला सुरक्षित बाहेर काढले.
दुसरीकडे, वधू पक्षाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हे लग्न दीड वर्षांपूर्वीच ठरले होते आणि दोघांनी कोर्ट मॅरेजही केले होते. नवरदेव परदेशातून सुट्टीवर आल्यामुळे आता केवळ पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित तरुणीने तीन दिवसांपूर्वीच वधूच्या घरी जाऊन लग्न मोडण्याची धमकी दिली होती. वधू पक्षाने हा प्रकार नवरदेवाच्या कुटुंबीयांना सांगितला होता, परंतु त्यांनी 'काही अडचण येणार नाही' असे सांगत आश्वासन दिले होते. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
"लग्न थांबवण्यासाठी एका तरुणीने पोलिसांकडे मदत मागितली होती. याप्रकरणी लग्न मंडपातून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून, चौकशीनंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल."
- अनिल कुमार वर्मा, पोलिस उपाधिक्षक (सागडी, आझमगड)