

Uddhav Thackeray Raj Thackeray alliance
नवी दिल्ली : राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत तिसऱ्या कोणासोबत चर्चा करायची गरज नाही. आमची भूमिका ठरवायला आम्ही दोघे समर्थ आहोत, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले. बुधवारपासून उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी संसदेतील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे, पक्षाचे खासदार आणि आमदार मिलींद नार्वेकर उपस्थित होते.
यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएने मराठी उमेदवार दिल्यास पाठिंबा देणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार अगोदर जाहीर होऊ द्या, त्यानंतर बघू. जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदावरुन तडकाफडकी का काढले ? ते आता कुठे आहेत? हे महत्वाचे असल्याचे ठाकरे म्हणाले. बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. बिहारमध्ये सध्या एसआयआर अंतर्गत मतदारांना स्वतःची ओळख पटवून द्यावी लागत आहे. मग देशात अघोषित एनआरसी लागू केला आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला.
ईव्हीएमवर आमचा आक्षेप असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाही. यामुळे अपारदर्शकता वाढणार आहे. मग निवडणूका घेता कशाला ? असा सवाल त्यांनी केला. मतदारांना मते कुठे जात आहेत हे कळत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बॅलेट पेपरवर मतदान केल्यावर समजायचे की मत कोणाला दिले आहे. निवडणूका न घेता सरळ विजयाची घोषणा करुन टाका, असे ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची थट्टा करत आहेत. खिल्ली उडवत आहेत. आपण त्यांना जाब विचारत नाही. देशाचे सरकार कोण चालवत आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आपल्या देशाला मजबूत सरकारची गरज आहे. पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्र्यांची देशाला गरज आहे. सध्याचे सर्व मंत्री हे भाजपचे प्रचारमंत्री आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली. सरकार अपयशी ठरले आहे. सरकारची परराष्ट्र नीती अपयशी ठरली आहे.
केंद्र सरकारला नीतिमत्ता राहिलेली नाही. पाकिस्तान शत्रु आहे हे बाळासाहेब ठाकरे सांगायचे. जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवू नये. सुषमा स्वराज देखील म्हणाल्या होत्या पाकिस्तानसोबत संबंध ठेवू नये. जय शाह आणि इतर मंत्र्यांची मुलेबाळे दुबईला जाऊन क्रिकेट सामने बघतात, असे ठाकरे म्हणाले. पाकिस्तानसोबत संबंध न ठेवणारा सच्चा देशभक्त, असे ठाकरे म्हणाले.