

कीव्ह; वृत्तसंस्था : युक्रेनच्या ओडेसा बंदरात व्यापारी जहाजावर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर दोन भारतीय खलाशी बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. त्यांचा शोध सुरू आहे. दोन खलाशी सुखरूप आहे.
या हल्ल्यामुळे काळ्या समुद्रातील व्यावसायिक जहाजांसमोरील धोके पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. या घटनेच्या काही दिवस आधीच एका प्राणघातक हल्ल्यात भारतीय खलाशाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भारताने संघर्षग्रस्त काळ्या समुद्र क्षेत्रात काम करणाऱ्या जहाजांवरील नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
कीव्हमधील भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, व्यापारी जहाज 'एमव्ही एजीएन रॅग्नार' शनिवारी युक्रेनच्या ओडेसा बंदरावर नांगरलेले असताना त्यावर हल्ला झाला. हल्ल्याच्या वेळी या जहाजावर चार भारतीय खलाशी होते. भारतीय दूतावासाने रविवारी पुष्टी केली की, दोन भारतीय खलाशी सुरक्षित आहेत, तर उर्वरित दोघांची माहिती घेण्यात येत आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू असून भारतीय अधिकारी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
युक्रेनमधील भारतीय दूतावासामतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, २५ जुलै रोजी ओडेसा बंदरावर हल्ला झालेल्या 'एमव्ही एजीएन रॅग्नार' या जहाजाशी संबंधित घटनेनंतर युक्रेनमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. खलाशी आणि त्यांच्या कुटुंबाना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.