

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : २३ वर्षांपुर्वी देशाच्या संसदेवर दहशतवादी हल्ला (2001 Parliament Attack) झाला होता. या हल्ल्यातील शहीदांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आदरांजली वाहिली. देशातील प्रमुख नेत्यांसह सामान्य जनतेनेही शहिदांना आदरांजली अर्पण केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या घटनेच्या आठवणीवर व्यक्त होत म्हणाल्या की, '२००१ मध्ये आजच्या दिवशी संसदेची सुरक्षा सांभाळताना जे शहीद झाले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते. सर्व शहिदांचे धैर्य आणि निस्वार्थ सेवा आपल्याला सतत प्रेरणादायी आहे. आपला देश त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मनापासून ऋणी आहे. या दिवशी दहशतवादाचा सामना करण्याच्या भारताच्या संकल्पाचा मी पुनरुच्चार करते. आपला देश कायमच दहशतवादी शक्तीविरुद्ध एकजुटीने उभा राहिला आहे.’ तर ‘शहीदांचे बलिदान देशाला नेहमीच प्रेरणा देत राहील. त्यांच्या धैर्याचे आणि समर्पणाचे आम्ही सदैव ऋणी राहू,’ अशा शब्दात पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही शहीद जवानांना आदरांजली वाहिली. संपूर्ण देश दहशतवादाविरोधात उभा असल्याचे ते म्हणाले.
शुक्रवारी संसद भवन परिसरात दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पित करण्यात आली. याठिकाणी उपराष्ट्रपती जगदीप धनकड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्री, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनीही उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली.
१३ डिसेंबर २००१ रोजी देशाच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या दिवशी या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे ५ जवान, संसदेचे दोन सुरक्षा कर्मचारी, सीआयएसएफचे १ कर्मचारी आणि १ बागकाम करणारे कर्मचारीही शहीद झाले. २३ वर्षांपुर्वी संसदेवर हल्ला करणारे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. ५ दहशतवादी कारमधून संसद परिसरात शिरले होते. त्यांच्या गाडीवर गृह मंत्रालय आणि संसदेचे स्टिकर्स होते. या पाचही दहशतवाद्यांना संसद परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कंठस्नान मारले.