पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली वक्फ बोर्ड मनी लाँडरिंग प्रकरणी आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांना अद्याप कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आज (दि.२३ सप्टेंबर) पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत आमदार अमानतुल्ला खान यांच्या कोठडी वाढ केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांना सक्तवसुली संचालनालयाने २ सप्टेंबर रोजी अटक केली होती.
अमानतुल्ला खान हे 2018 ते 2022 दरम्यान दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात बेकायदेशीररीत्या कर्मचाऱ्यांची भरती आणि वक्फ बोर्डाच्या मालमत्ता चुकीच्या पद्धतीने भाड्याने दिल्याच्या आरोपांची ईडी चौकशी करत आहेत. या प्रकरणी खान यांची 12 तासांहून अधिक चौकशी केली आहे. खान यांनी बेकायदेशीर कृत्यांमधून मोठी रक्कम मिळवली. यातून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावे स्थावर मालमत्ता खरेदी केली, असाही त्यांच्यावर आरोप आहे.
१० ऑक्टोबर २०२३ रोजी ईडीने अमानतुल्ला खान यांच्या संबंधित असणार्या दिल्लीतील 5 ठिकाणी छापे टाकले. ईडीने अमानतुल्ला खान यांच्या घरावरही छापा टाकला होता. दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या दोन एफआयआरनंतर ही कारवाई करण्यात आली होती. दिल्ली वक्फ बोर्डातील नोकऱ्यांमधील अनियमिततेशी संबंधित गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई झाली होती. १८ एप्रिल २०२४ रोजी ईडीने अमानतुल्ला खान यांची तब्बल १३ तास चौकशी केली होती.