

Tamil Nadu government formation: तमिळ नाडूत सत्ता स्थापनेचा पेच कायम असून जनतेने नवख्या टीव्हीकेला १०८ जागा देत पूर्ण बहूमतापासून वंचित ठेवलं. त्यामुळं आता जोसेफ विजय अर्थात थलपती विजयला आपलं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहेत. काँग्रेसने विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा देत त्याला थोडा दिसाला दिला असला तरी काँग्रेस सोबत आल्यावर बेरीज ११३ पर्यंतच पोहचते. बहूमतासाठी ११८ आमदारांचे समर्थन गरजेचं आहे. आज विजय थलपती १० वाजता शपथ घेणार होता मात्र हा मुहूर्त हुकला आहे. यामागे राज्यपालांनी घेतलेली भूमिका कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीव्हीआर प्रमुख विजय हे ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मात्र तमिळ नाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी हा शपथविधी आज होण्याची शक्यता कमी असल्याचं सुचित केलं आहे. राज्यपालांनी विजय यांना आधी बहूमताचा आकडा जुळवा त्यानंतर शपथ घ्या असं सांगितल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडी बुधवारी झाल्या होत्या.
तमिळ नाडू सत्ता स्थापनेचा पेच याबाबत बोलायचं झालं तर भारतात एखादे सरकार स्थापन करायचं असेल तर सहसा राज्यपाल सर्वात जास्त सदस्य निवडून आलेल्या पक्षाला पहिल्यांदा पाचारण करतात. किंवा ज्या निवडणूक पूर्व आघाडीने बहुमताचा आकडा पार केलेला असतो त्याला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करतात. महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीनंतर असंच करण्यात आलं होतं. मात्र असं असलं तरी याबाबत असा कोणताही कायदा नाहीये. घटनेत हा विषय राज्यपालांच्या विवेकावर सोडण्यात आला आहे.
कायदे तज्ज्ञ विजयन सुब्रमण्यम यांनी सांगितलं की, राज्यपाल गोंधळ निर्माण करत आहेत. ते पुढे म्हणाले की, 'एसआर बोम्मई विरूद्ध युनियन ऑफ इंडिया यांच्या केसंमध्ये सर्वोच्च न्यायालायने स्पष्टपणे बहूमत हे सभागृहात फ्लोअर टेस्ट द्वारेच सिद्ध करण्यात यावे. राज्यपालांच्या वैयक्तिक किंवा व्यक्तीनिष्ठ मुल्यांकनावर आधारित असू नये असं सांगितलं आहे.'
सुब्रमण्यम यांनी फ्लोअर टेस्टपूर्वी राज्यपालांसमोर निवडून आलेल्या नेत्यांची परेड किंवा वैयक्तिकरित्या पाठिंबा दर्शवणे हे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेल्या घटनेच्या तत्वांशी विसंगती सांगणारे ठरेल असे देखील मत व्यक्त केलं.
राज्यातील सत्तास्थापनेचा पेच पाहता डीएमके काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तमिळ नाडूचे माजी मुख्यमंत्री आणि स्टॅलिन यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना विजयला सत्ता स्थापन करू द्यावे असे मत व्यक्त केले.
ते म्हणाले की मला आशा आहे की नवीन सरकार हे आमच्या स्कीम कायम ठेवतील. तसेच त्यांनी निवडणुकीत जी आश्वासने दिली होती. ती पूर्ण करतील.
स्टॅलिन यांनी नवीन सरकारने शाळकरी मुलांना मोफत नाष्टा देण्याची स्कीम सुरू ठेवली पाहिजे. तसेच गृहिणींना महिन्याला १ हजार भत्ता देण्यात येत होता तो देखील सुरू ठेवावा. अशी मागणी केली आहे.