चेन्नई; वृत्तसंस्था : तमिळनाडूला अवकाळी पावसाने झोडपून काढले. विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांत 4 जणांचा बळी गेला. दोन दिवसांपासून तमिळनाडूत मुसळधार पाऊस सुरू आहे. कन्याकुमारीसह अन्य जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला. रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
गेल्या 24 तासांत कायलपट्टीनम जिल्ह्यात 96 सेंटिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे हवामान विभागाने चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट लागू केला आहे. पुढील 24 तासांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली असून, हजारो प्रवासी तमिळनाडूत अडकून पडले आहेत.