

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर १८ मार्च रोजी धरतीवर पोहोचल्या. पृथ्वीवर परतल्यानंतर सोमवारी (दि.३१) त्यांनी पहिल्यांदाच मुलाखत दिली आणि अंतराळात घालवलेल्या नऊ महिन्यांचा अनुभव सांगितला. भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून भारताला जगातील सर्वोत्तम असे वर्णन केले होते. त्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी अंतळातून भारत 'अद्भुत' दिसत असल्याचे म्हटले आहे. तसेच अवकाशातून दिवसा हिमालय पाहणे आश्चर्यकारक असल्याचे देखील सुनीता म्हणाल्या.
अंतराळातून परतल्यानंतर सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, आम्हाला घरी पोहोचवल्याबद्दल मी नासा, बोईंग, स्पेसएक्स आणि या मोहिमेशी संबंधित सर्वांचे आभार मानू इच्छिते. आपण पृथ्वीवर परतून जवळजवळ दोन आठवडे झाले आहेत. आता आम्हाला विचारले जात आहे की, आपण काय करत आहात? तर मी तुम्हाला सांगतो की, आम्ही नवीन आव्हानांसाठी तयारी करत आहोत. नवीन मोहिमेची तयारी करत आहे. मी कालच तीन मैल धावले, म्हणून मी स्वतःची पाठ नक्कीच थोपटू शकते.
सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, "आम्ही पहिल्यांदाच नवीन अंतराळयानात होतो. आमचे संपूर्ण लक्ष आम्ही ज्या मोहिमेसाठी अंतराळ स्थानकात गेलो होतो ते पूर्ण करण्यावर होते. आम्ही अनेक प्रकारचे अवकाश प्रयोग केले. आम्ही अंतराळात अडकलो आहोत असे कधीच वाटले नाही. आम्हाला माहितही नव्हते की पृथ्वीवर काय चालले आहे? एका अर्थाने, आम्ही जगाभोवती फिरत नव्हतो तर जग आपल्याभोवती फिरत होते. अंतराळ स्थानकावर सतत रोटेशन फ्लाइट्स येत होत्या, त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास होता की आम्ही नक्कीच घरी परतू".
विल्यम्स यांनी सांगितले की, १८ मार्च रोजी त्यांनी नऊ महिन्यांनंतर पहिल्यांदाच पृथ्वीवर पाऊल ठेवले. म्हणून सर्वप्रथम त्यांना तिच्या पतीला आणि पाळीव कुत्र्यांना मिठी मारायची होती. अन्न ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला घराची आठवण करून देते. माझे वडील शाकाहारी होते म्हणून घरी आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मी एक छान ग्रिल्ड चीज सँडविच खाल्ले असल्याचे सुनीता म्हणाल्या.
सुनीता विल्यम्स म्हणतात की, आमच्या मोहिमेतील विलंबातून आम्हाला आशेचा धडा मिळाला आहे. पुढच्या वेळी चांगले करता यावे म्हणून आपण प्रत्येक छोट्या चुकीतून शिकत आहोत. अशाप्रकारे गोष्टी घडतात, आपण शिकतो आणि पुढे जातो आणि चांगले बनतो. तुमचे शरीर प्रत्येक गोष्टीशी कसे जुळवून घेत आहे हे खूप आश्चर्यकारक आहे. जेव्हा आपण पहिल्यांदा पृथ्वीवर आलो तेव्हा आपण डळमळीत होऊ लागलो. पण काही तासांतच बदल दिसून येतात. मानवी मन त्याच्या सभोवतालच्या गोष्टी समजून घेऊ लागते.
पुढे माध्यमांशी बोलतना विल्यम्स म्हणाल्या, या मोहिमेने मला आयुष्यभराचा धडा दिला. अशा परिस्थितीतही आम्हाला संधी होती. आम्ही एकही संधी गमावली असे नाही पण मला आणखी एक संधी मिळाली. या काळात मी खूप काही शिकले. वास्तविकता अशी आहे की, जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नसतील तेव्हा डोळे बंद करा आणि आता तुमच्यासाठी काय चांगले वाट पाहत आहे याचा विचार करा.
सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, भारत अद्भुत आहे. आम्ही जेव्हा जेव्हा हिमालयावरून जात होतो तेव्हा बुच विल्मरने त्यांचे अविश्वसनीय फोटो काढले. अवकाशातून हिमालयाचे दृश्य अद्भुत आहे. आम्हाला असे वाटले की, भारतात अवकाशात लहरी उमटत आहेत आणि त्या खाली वाहत आहेत. भारताचे अनेक रंग आहेत, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना, किनाऱ्यांवर मासेमारी करणाऱ्या बोटींचा ताफा गुजरात आणि मुंबईच्या आगमनाचे संकेत देतो. दिवसा हिमालय पाहणे आश्चर्यकारक होते. भारतात मोठ्या शहरांपासून ते लहान शहरांपर्यंत रात्रीच्या वेळी अविश्वसनीय दिसणारे दिव्यांचे जाळे दिसते.
माझ्या वडिलांच्या मायभूमीत म्हणजेच भारतात त्या नक्कीच येतील, असेही सुनीता म्हणाल्या, अॅक्सिओम मोहिमेवर जाणाऱ्या भारतीय अंतराळवीराबद्दल त्या उत्सुक आहेत. मला आशा आहे की, मला कधीतरी त्यांना भेटायला मिळेल आणि आपण भारतातील जास्तीत जास्त लोकांसोबत आपला अनुभव शेअर करू शकू. भारत हा एक महान देश आहे आणि एक अद्भुत लोकशाही आहे जी अंतराळात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला याचा एक भाग होऊन भारताला मदत करायची आहे, असेदेखील सुनीता विल्यम्स यांनी म्हटले आहे.