

Sonam Wangchuk Statement: नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत २६ दिवस उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी आता केंद्र सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर जम्मू काश्मीरमध्ये परतलेल्या आणि एक दिवस आराम करून लडाखमध्ये पोहचलेल्या वांचुक यांनी संसदेत पेपर लीक विधेयक पास झाल्यावर आनंद व्यक्त केला. त्यांनी या दिशेने प्रयत्न सुरू राहतील अशी आशा व्यक्त केली. तसेच त्यांना जसे वचन दिले होते तसे आंदोलकांवर कारवाई करू नका अशी मागणी देखील त्यांनी सरकारकडे केली आहे.
जंतर मंतर वरील कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनाच्या यशामागे सोनम वांगचुक यांची मोठी भूमिका आहे असं मानलं जात आहे. १८ जुलै रोजी सोनम वांगचुक यांना ज्या प्रकारे आंदोलन स्थळावरून उचलण्यात आले त्यानंतर जंतर मंतरवरील आंदोलन तीव्र झालं अन् हजारोंच्या संख्येने तरूण रस्त्यावर उतरले. त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.
वांगचुक यांना गुरूग्राममधील रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतलं. त्यानंतर ते लडाखकडे रवाना झाले. वांगचुक यांनी गुरूवारी एक व्हिडिओ शेअर करत वंदे भारत ट्रेनमध्ये पहिल्यांदाच प्रवास केल्याचं सांगितलं. ते चिनाब ब्रिज देखील पाहू इच्छित होते. त्यांना हा अनुभव खूप छान असल्याचं सांगत भारतीय रेल्वेचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगितलं.
सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारने लोकसभेत परीक्षा लीक विरूद्धच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक पास केल्यावर आनंद व्यक्त केला. सरकारसमोर ज्या मागण्या ठेवल्या होत्या त्यावर संसदेत चर्चा झाली. वांगचुक म्हणाले की, मला आनंद आहे की संसदेत परीक्षा सुधारणा दुरूस्ती विधेयक आणलं गेलं. आशा आहे की फक्त परीक्षाच नाही तर शिक्षण प्रणालीत देखील सुधारणा होईल.
तसेच त्यांनी मला दिलेल्या लेखी किंवा सीजेपीला दिलेल्या आंदोलकांवर कारवाई न करण्याच्या गोष्टीवर सरकारने कायम रहावे असे सांगितलं. देशात युवा पिढीमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करा. सर्वांनी मिळून देश निर्मिती आणि भारताला महान बनवण्याचे प्रयत्न करावेत अशी प्रतिक्रिया देखील दिली.