

Samay Raina India’s Got Latent: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन समय रैनाचा ‘India’s Got Latent’ हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या एका टांझानियाच्या विद्यार्थ्याने केलेले वक्तव्य व्हायरल होत आहे.
या विद्यार्थ्याने भारतात शिक्षण घेत असताना त्याला भारत सरकारकडून शिष्यवृत्ती आणि दर महिन्याला स्टायपेंड मिळत असल्याचे सांगितले. त्याच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय करदात्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सुरुवात X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टपासून झाली. नेहा पटेल नावाच्या युजरने ‘India’s Got Latent’मधील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली. या व्हिडीओमध्ये टांझानियातील विद्यार्थी भारतात शिक्षण घेत असल्याचे सांगतो.
भारत सरकारकडून त्याला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि दर महिन्याला आर्थिक मदत मिळत असल्याचे त्याने सांगितले. या पैशांपैकी काही रक्कम वाचवून तो टांझानियातील आपल्या आईला पैसे पाठवत असल्याचे त्याने सांगितल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. याच वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली.
व्हिडीओ समोर आल्यानंतर काही भारतीय करदात्यांनी सरकारच्या परदेशी विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनांवर प्रश्न उपस्थित केले.
भारतातील अनेक विद्यार्थी IIT, AIIMS आणि दिल्ली विद्यापीठासारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जागा, हॉस्टेल आणि आर्थिक मदतीसाठी संघर्ष करत असताना, परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय सरकारकडून आर्थिक मदत का दिली जाते, असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला.
नेहा पटेल यांच्या पोस्टमध्येही याच मुद्द्यावरून सरकारवर टीका करण्यात आली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये भारतीय करदात्यांच्या पैशांचा वापर परदेशात पैसे पाठवण्यासाठी केला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणावर सोशल मीडियावर एकमत दिसून आले नाही. काही लोकांनी परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला विरोध केला, तर काहींनी भारताच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि राजनयिक धोरणाचे समर्थन केले.
काही युजर्सनी सांगितले की, भारत सरकारच्या Indian Council for Cultural Relations म्हणजेच ICCRच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेचा उद्देश केवळ शिक्षण देणे नसून भारताचे इतर देशांशी सांस्कृतिक आणि राजकीय संबंध मजबूत करणे हा देखील असतो, असा युक्तिवाद करण्यात आला.
या योजनेचे समर्थन करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, भारत ज्या प्रकारे परदेशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो, त्याचप्रमाणे भारतीय विद्यार्थ्यांनाही अनेक देशांमध्ये शिष्यवृत्ती मिळतात.
परदेशी शिक्षणासाठी Erasmus Mundusसारख्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा भारतीय विद्यार्थ्यांना फायदा होतो. त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना भारतात दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीकडे केवळ खर्च म्हणून न पाहता, त्यामागील दीर्घकालीन राजकीय आणि शैक्षणिक उद्देशही समजून घेण्याची गरज असल्याचे काही युजर्सनी म्हटले.
या संपूर्ण प्रकरणामुळे एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे, सरकारने परदेशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे योग्य आहे का?
एका बाजूला भारतीय करदात्यांचा पैसा भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अधिक प्रमाणात वापरला जावा, अशी मागणी आहे. तर दुसऱ्या बाजूला परदेशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे हा भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा एक भाग असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे ‘India’s Got Latent’मधील एका विद्यार्थ्याच्या वक्तव्यामुळे सुरू झालेली सोशल मीडिया चर्चा आता शिष्यवृत्ती, करदात्यांचा पैसा, परदेशी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भारताच्या धोरणापर्यंत पोहोचली आहे.