![एस. जयशंकर आणि अश्विनी वैष्णव यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2Funnamed-file-240.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी रविवारी ( ९ जून) शपथ घेतली. त्यांच्यासह ७२ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सोमवारी सायंकाळी खाते वाटपही झाले. नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात कोणतेही मोठे फेरबदल टाळले. आज (दि. ११) एस. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून तर अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्री म्हणून, भूपेंद्र यादव यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
परराष्ट्र मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर एस. जयशंकर म्हणाले की, "परराष्ट्र मंत्रालयाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी पुन्हा एकदा देण्यात आली हा एक मोठा सन्मान आहे. मागील सरकारमध्ये या मंत्रालयाने उत्कृष्ट कामगिरी केली. आम्ही G20 चे अध्यक्षपद भूषवले. कोरोनाची आव्हाने स्वीकारली. आम्ही ऑपरेशन गंगा आणि ऑपरेशन कावेरी सारख्या महत्त्वपूर्ण ऑपरेशन्स राबवली. परराष्ट्र मंत्रालय सुधारित पासपोर्ट सेवांच्या बाबतीत खूप लोक-केंद्रित मंत्रालय बनले आहे."
अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. तसेच त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभारही स्वीकारला आहे. यानंतर बोलताना ते म्हणाले की, देशातील जनतेने पंतप्रधान मोदींना पुन्हा देशसेवा करण्यासाठी आशीर्वाद दिला आहे. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेम विद्युतीकरण, नवीन ट्रॅकचे बांधकाम, नवीन ट्रेनचे बांधकाम, रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासाचे मोठ काम केले आहे. रेल्वे ही सामान्य माणसाच्या प्रवासाचे साधन आहे. तसेच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत कणा आहे, म्हणून रेल्वेच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
"पंतप्रधान मोदींनी अन्न प्रक्रिया मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे आणि त्यासाठी मी कठोर परिश्रम घेईन. भविष्य अन्न प्रक्रियेसाठी आहे आणि त्यात अमर्याद वाव आहे. आगामी काळात या विभागात भारताचा सहभाग वाढेल. या विभागातील वाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह म्हणतात, "आज मी पदभार स्वीकारला आहे. वस्त्रोद्योग क्षेत्र हे असे क्षेत्र आहे जे सर्वाधिक नोकऱ्या देते. तप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही सर्वजण ते पुढे नेण्यासाठी काम करू कारण ते शेतकऱ्यांशीही हे क्षेत्र जोडलेले आहे, असेही ते म्हणाले.
जयंत चौधरी यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयात राज्यमंत्री (MoS) म्हणून पदभार स्वीकारला.
जगत प्रकाश नड्डा यांनी घेतली आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी अनुप्रिया पटेल आणि प्रतापराव गणपतराव जाधव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री देखील उपस्थित होते.