![जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेबाबात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुरक्षा बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, लेफ्टनंट. जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2Funnamed-file-326.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेबाबात आज (दि १६) उच्चस्तरीय सुरक्षा बैठक झाली. राज्यात झिरो टेरर प्लॅननुसार काश्मीर खोर्यात मिळालेल्या यशाची सुरक्षा दलांनी पुनरावृत्ती करावी. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाला चोख प्रत्युत्तर द्या. कोणत्याही किंमतीवर दहशतवाद रोखलाच पाहिजे, असे निर्देश देत केंद्र सरकार दहशतवाद्यांवर कारवाईसाठी कटिबद्ध असल्याचेही अमित शहा यांनी सुरक्षा बैठकीत स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरबाबत उच्चस्तरीय सुरक्षा बैठक झाली यावेळी अमरनाथच्या वार्षिक यात्रेसाठीच्या सुरक्षा व्यवस्था आणि दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जम्मू प्रदेशातील सध्याची सुरक्षा परिस्थिती' यांचा आढावा घेण्यात आला. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, लेफ्टनंट. जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शाह यांनी जम्मू प्रदेशातील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. गृहमंत्र्यांना जम्मूमधील सध्याच्या सुरक्षेच्या परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली. जम्मूमध्ये कार्यरत दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले.
गृहमंत्र्यांनी शिवखोडी यात्रेकरूंवरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. वैष्णोदेवी, शिवखोडी आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी समन्वित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सुरक्षा दल आणि यात्रेकरूंच्या हालचालींचे रक्षण करण्यासाठी महामार्ग आणि संवेदनशील ठिकाणांवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले. 'जम्मूमध्ये दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि कोणत्याही किंमतीत या भागात दहशतवाद वाढू देऊ नये.'
'ज्या ठिकाणाहून परदेशी दहशतवादी या बाजूने घुसण्यात यशस्वी झाले आहेत ते ठिकाण बंद करण्यावरही त्यांनी भर दिला.' गृहमंत्र्यांनी आगामी अमरनाथ यात्रेसाठी 'बहुस्तरीय सुरक्षा कवच' ठेवण्याचे आवाहन केले आणि 'प्रत्येक यात्रेकरूचे संरक्षण केले पाहिजे आणि तीर्थयात्रा सुरक्षित वातावरणात पार पडली पाहिजे. गृहमंत्र्यांनी बेस कॅम्पपर्यंतच्या प्रवासी मार्गांच्या सुरक्षेवरही भर दिला. वार्षिक यात्रा २९ जूनला सुरू होऊन १९ ऑगस्टला संपेल. या बैठकीत काश्मीर आणि जम्मूमधील सर्व पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा योजनांवर चर्चा करण्यात आली आणि दहशतवाद्यांचे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजनांना अंतिम रूप देण्यात आले.