

ODOP Gold Medal Winners
नवी दिल्ली : ‘एक जिल्हा, एक उत्पादन-2024’अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून, राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्णपदक प्राप्त झाले. ‘आंब्यांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला. यासह नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि गैर-कृषी क्षेत्रातील विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत.
सोमवारी दिल्लीत राष्ट्रीयस्तरावरील ‘एक जिल्हा, एक उत्पादन-2024’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री जितीन प्रसाद प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राने आपल्या उत्पादनांच्या नावीन्यपूर्णतेने, उच्च दर्जाने आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीयस्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
‘आंब्यांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला. कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले आहे. हापूस आंब्याची चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी, यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हे यश मिळाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला.
‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जागतिक बाजारपेठेत त्यांचा ठसा उमटवणे आहे. या उपक्रमांतर्गत 2024 च्या पुरस्कार समारंभात महाराष्ट्राने आपली उत्कृष्टता सिद्ध करून विविध श्रेणीत पुरस्कार मिळविले. हे पुरस्कार जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास या तीन गटांमध्ये वितरित करण्यात आले.
महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात आपली आघाडी कायम राखत विविध जिल्ह्यांच्या उत्पादनांना मान्यता मिळवली आहे. याअंतर्गत खालील जिल्ह्यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कृषी उत्पादनांसाठी पुरस्कार पटकावले.
नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत द्वितीय स्थान प्राप्त केले असून, नागपुरी संत्र्यांच्या चवीने आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेने देश-विदेशात ख्याती मिळवली आहे. या यशामुळे नागपूर जिल्ह्याचा कृषी वारसा आणखी समृद्ध झाला आहे. रौप्यपदकाचा पुरस्कार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वीकारला.
अमरावती जिल्ह्याने आपल्या मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत तृतीय स्थान मिळवले. संत्रा उत्पादनातील सातत्य, गुणवत्ता आणि बागायती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रयत्न यामुळे अमरावतीने हे यश संपादन केले.