

West Asia crisis India impact
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 'अनौपचारिक सक्षम गट' (IGoM) ची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली की, सरकार पुरवठा साखळीत (Supply Chain) कोणतीही कमतरता किंवा अडथळा येऊ नये यासाठी केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे परिस्थिती सतत गंभीर होत असून, त्याचे पडसाद भारतावरही उमटताना दिसत आहेत. व्यापारी मार्गांवर दबाव वाढत असून गॅस आणि तेलासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सोमवारी 'अनौपचारिक सक्षम गटा'ची (IGoM) पाचवी बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते.
या बैठकीत ऊर्जा पुरवठा साखळी आणि देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेशी संबंधित संभाव्य जोखमींचा आढावा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' पोस्टमध्ये लिहिलं की, "मी नागरिकांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारे न घाबरण्याचे आवाहन करतो, कारण सरकार पुरवठा साखळीतील कोणताही अडथळा रोखण्यासाठी ठोस पावले उचलत आहे."
जागतिक उलथापालथ आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी जनतेने सामूहिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. हे आवाहन आत्मनिर्भरता आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, कठीण जागतिक काळात ऊर्जा बचतीसाठी पंतप्रधानांनी दिलेला हा एक मोठा संदेश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रविवारी तेलंगणातील सिकंदराबाद येथे एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, पुढील एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "देशहितासाठी आपल्याला ठरवावे लागेल की, वर्षभर घरात कोणताही कार्यक्रम असला तरी आपण सोन्याचे दागिने खरेदी करणार नाही." यावेळी त्यांनी कोरोना काळातील परिस्थितीचाही संदर्भ दिला होता.