

Rahul Gandhi on Election Commission
नवी दिल्ली : बिहार आणि कर्नाटकमधील मतदार याद्यांमध्ये हेतुपुरस्सर फेरफार केले जात असल्याचा गंभीर आरोप करत लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) तीव्र शब्दांत इशारा दिला आहे.
बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेवरून विरोधी पक्षांचे आंदोलन सुरू असताना, राहुल गांधी यांनी "आम्ही तुम्हाला सोडणार नाही," अशा शब्दांत आयोगाला जबाबदार धरण्याचा निर्धार व्यक्त केला.
संसदेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली.
"मला निवडणूक आयोगाला एक संदेश द्यायचा आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यातून सहीसलामत सुटाल, तर तो तुमचा गैरसमज आहे. तुम्ही यातून सुटू शकणार नाही, कारण आम्ही तुम्हाला सोडणार नाही," असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका करत म्हटले की, "निवडणूक आयोग 'भारतीय निवडणूक आयोग' म्हणून आपले काम करत नाहीये. ते आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत."
राहुल गांधी यांनी केवळ बिहारपुरता मर्यादित न राहता कर्नाटकातील एका मतदारसंघाचा उल्लेख करत तेथेही निवडणूक आयोगाने अनियमिततेला परवानगी दिल्याचा दावा केला. ते म्हणाले की, तरुण आणि पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली जात आहेत, तर दुसरीकडे 50, 60 आणि 65 वर्षे वयाच्या व्यक्तींची नावे मतदार यादीत जोडली जात आहेत.
"आज आमच्याकडे कर्नाटकातील एका जागेवर निवडणूक आयोगाने घोटाळा करू दिल्याचा 100 टक्के पुरावा आहे. आम्ही फक्त एका मतदारसंघाची पाहणी केली आणि आम्हाला हे सत्य आढळले," असा दावाही त्यांनी केला.
या मुद्द्यावर राहुल गांधी यांना समाजवादी पार्टी आणि द्रमुक (DMK) यांसारख्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला. विरोधी पक्षांच्या मते, 'SIR' प्रक्रिया विशेषतः वंचित आणि उपेक्षित समाजातील मतदारांना लक्ष्य करण्यासाठी राबवली जात आहे, जेणेकरून बिहार निवडणुकीपूर्वी सरकारविरोधी मतांना दडपता येईल.
या प्रक्रियेच्या विरोधात विरोधी खासदारांनी सलग चौथ्या दिवशी संसद परिसरात जोरदार निदर्शने केली. 'SIR म्हणजे लोकशाहीची हत्या' असे लिहिलेले फलक हातात घेऊन खासदारांनी 'न्याय, न्याय, न्याय' अशा घोषणा दिल्या. या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चेची मागणीही त्यांनी लावून धरली आहे.
एकीकडे विरोधी पक्ष आक्रमक झालेले असताना, दुसरीकडे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आयोगाच्या भूमिकेचा बचाव केला आहे. त्यांनी म्हटले की, स्वच्छ आणि अचूक मतदार यादी हेच लोकशाहीच्या अखंडतेचा आधार आहे.
निवडणूक आयोगाने पारदर्शक प्रक्रियेद्वारे स्वच्छ मतदार यादी तयार करणे, हेच निष्पक्ष निवडणुका आणि मजबूत लोकशाहीचा पाया नाही का?" असा सवाल करत त्यांनी पुनरीक्षण मोहिमेचे समर्थन केले. मतदार यादीत अपात्र किंवा कालबाह्य नोंदी ठेवणे हे घटनात्मक तत्त्वांचे उल्लंघन ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाद चिघळणार...
या संपूर्ण प्रकरणामुळे केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.