

Rahul Gandhi targets BJP, Election Commission
भोपाळ : 'लोकशाही आणि संविधानावर हल्ला' होत असल्याचा दावा करत, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'मतचोरी'च्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणूक आयोगावर आज (दि. ९) पुन्हा एकदा निशाणा साधाला. आपल्याकडे आणखी पुरावे असून ते लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मध्य प्रदेश दौर्यावर असणारे राहुल गांधी यांनी पचमढी येथे माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मतचोरी स्पष्टपणे झाली आहे. पंचवीस लाख मते चोरली गेली आहेत. प्रत्येक आठ मतांपैकी एक मत चोरले गेले आहे. आकडेवारी पाहिल्यानंतर, मला वाटते की मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातही असेच घडले आहे. ही भाजप आणि निवडणूक आयोगाची एक व्यवस्था आहे. आमच्याकडे आणखी पुरावे आहेत, आणि ते आम्ही काही वेळाने दाखवू." निवडणुकीतील गैरव्यवहार संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी सत्ताधारी भाजपने एक यंत्रणा तयार केल्याचा आरोपही त्यांनी केला.मुख्य मुद्दा मतचोरीचा आहे आणि 'एसआयआर' ही ती झाकण्यासाठी आणि संस्थात्मक करण्यासाठीची एक व्यवस्था आहे, असेही ते म्हणाले.
गांधी म्हणाले, "आमच्याकडे सविस्तर माहिती आहे. आम्ही आत्तापर्यंत खूप कमी दाखवले आहे, पण मुख्य मुद्दा हा आहे की लोकशाही आणि भारतीय संविधानावर हल्ला होत आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे थेट संयुक्त भागीदारीतून करत आहेत. यामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी पचमढी येथे मध्य प्रदेश युनिटच्या पक्षनेत्यांशीही संवाद साधला.राहुल गांधी यांनी शनिवारी 'संघटन निर्माण अभियाना'अंतर्गत जिल्हा/शहर अध्यक्षांसाठीच्या प्रशिक्षण शिबिराला संबोधित केले आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.