

Ram Mandir Donation Theft : अयोध्येतील 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'मधील देणगी चोरीच्या कथित प्रकरणाची "स्वतंत्र आणि सर्वसमावेशक" चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या मुद्द्यावर पंतप्रधानांच्या सततच्या मौनाला "अस्वीकारार्ह" असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
"अशा गुन्ह्यासमोर तुमचे आताचे मौन हे अस्वीकारार्ह आहे. जबाबदारी निश्चित करणे आणि नुकसान भरपाई करणे हे तुमचे कर्तव्य आहे. सरकार आणि ट्रस्टची विश्वासार्हता तुम्ही किती पारदर्शक आणि वेगाने काम करता यावर अवलंबून आहे आणि भारताची जनता याकडे लक्ष ठेवून आहे," असे या दोन्ही नेत्यांनी पत्रात म्हटले आहे. मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या कथित अफरातफरीप्रकरणी २५ जून रोजी एफआयआर (FIR) नोंदवण्यात आल्यानंतर जवळपास एका महिन्याने हे पत्र समोर आले आहे. या घटनेनंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामे दिले होते. तेव्हापासून उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचा (SIT) कार्यकाळ १५ दिवसांनी वाढवला आहे.
खर्गे आणि राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पंतप्रधान मोदी यांनी संसदेत या ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली होती, परंतु याच्या सदस्यांची नियुक्ती "केवळ आणि केवळ" तुमच्या सरकारद्वारे केली गेली आहे. ट्रस्टचे सदस्य आरएसएस, व्हीएचपी आणि त्यांच्या संलग्न संघटनांशी जोडलेले आहेत आणि त्याचे "बदनामी झालेले" माजी सरचिटणीस मोदींचे "निकटवर्तीय" होते, हे जगजाहीर आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेत्यांनी मागणी केली आहे की, रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या दानासह ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जावी आणि त्याचे निष्कर्ष ट्रस्टच्या खात्यांसह सार्वजनिक केले जावेत. "पद किंवा प्रभावाचा विचार न करता, जबाबदार आढळणाऱ्या सर्वांना उत्तरदायी धरले पाहिजे," असे त्यांनी म्हटले आहे.
एसआयटीच्या (SIT) प्राथमिक निष्कर्षानुसार, साधारण ४० दिवसांच्या कालावधीत चोरीच्या जवळपास ७० घटना घडल्या. देणग्यांची मोजणी सुरू असताना काही व्यक्ती पैसे काढून घेतानाचे फुटेज समोर आल्याचे सांगितले जात आहे. चंपत राय यांचा माजी ड्रायव्हर राम शंकर यादव याच्यासह आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या महिन्यात पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेले हे दुसरे पत्र आहे. यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मोदींना पत्र लिहून प्राथमिक तपासात या अफरातफरीमागे एक "सुव्यवस्थित नेटवर्क" असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप केला होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली होती.