Rahul Gandhi Vote Chori: सॉफ्टवेअरच्या मदतीने मतदार डिलीट ते अल्पसंख्याक मतदारांनाच लक्ष्य; राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
Rahul Gandhi Press Conference On Vote Chori :
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी हे आज पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट करणार याची सर्वांना उत्सुकता होती. आज (दि. १८) राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होईल असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते पवन खेरा यांनी जाहीर केलं होतं. मात्र त्यांनी ही पत्रकार परिषद कशा संदर्भात असेल याचा उलगडा केला नव्हता. दरम्यान, ही पत्रकार परिषद सकाळी १० वाजता सुरू होईल असं सांगितलं होतं. मात्र काँग्रेसची ही पत्रकार परिषद एक तास उशिरा सुरू झाली. पाहुयात राहुल गांधी पत्रकार परिषदेत कोणता मोठा दावा केला आहे.
सॉफ्टवेअरच्या मदतीनं मतदार डिलीट
राहुल गांधी पत्रकार परिषदेत सॉफ्टवेअरच्या मदतीनं मतदार डिलीट करण्यात आले असा दावा केला. त्यांनी कर्नाटकातील आनंदमधील उदाहरण दिलं. त्यांनी दावा केला की ही सर्व मते काँग्रेसची होती. त्यांनी काही लोकांना देखील पत्रकार परिषदेत आणलं होत.
ते म्हणाले, 'हा सबळ पुरावा आहे की मुख्य निवडणूक आयुक्त हे मत चोरी करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. काही लोकं विशिष्ट लोकांचे मतदार पत्रातून नाव डिलीट करण्यासाठी काम करत आहेत. हे लोकं विरोधी पक्षाला मतदान करण्याची शक्यता आहे त्यांनी नावं डिलीट केली जात आहेत.'
बाहेरचे मोबाईल क्रमांक
ते पुढे म्हणाले की, 'मी कोणत्याही पुराव्याशिवाय बोलणार नाही. माझं देशावर प्रेम आहे. निर्णय घेण्याची जबाबदारी ही तुमची असेल. कर्नाटकातील मतदारसंघातील आलंदमध्ये मोठा झोल झालाय. कोणीतरी जवळपास ६ हजार मतदार डिलीट केले.
आलंदमध्ये ६ हजार अर्ज दाखल झाले. याद्वारे काँग्रेसची ६ हजार मतं डिलीट करण्यात आली. मात्र हे अर्ज सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आले. यासाठी कर्नाटकाच्या बाहेरचे मोबईल क्रमांक वापरण्यात आले.
गोदाबाई यांच्या नावानं फेक लॉग इन करण्यात आलं. त्याद्वारे १२ मतं डिलीट करण्यात आले. मात्र गोदाबाईंना याची काही कल्पनाच नव्हती.' यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत गोदाबाईंचा व्हिडिओच लावला.
यासाठी वेगवेगळ्या राज्यातील मोबाईल क्रमांक वापरण्यात आले. त्यामुळं प्रश्न निर्माण होतो की हा मोबाईल नंबर कोणाचा आहे. ते कुठून ऑपरेट करतात आणि त्यांना ओटीपी कुठून आला. असे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले.
सराखा सिरीअल नंबर
तसेच सूर्यकांत यांनी १२ मतं डिलीट केली. त्यांच्याशी मी बोललो आहे. राहुल गांधी यांनी सूर्यकांत यांना पत्रकार परिषदेत आणलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी हे काही केलेलं नाही. मी कोणालाही मेसेज केलेला नाही. मी कोणाचंही नाव डिलीट केलेलं नाही असा दावा केला.
तुम्ही मतदार डिलीट करण्याचा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा तुम्हाला किती वेळ लागतो हे कळून येईल. मात्र ३४ सेकंदात दोन अर्ज भरण्यात आले आहेत. असा दावा देखील राहुल गांधी यांनी केला.
सिरीअल नंबर हा फक्त १ का... यासाठी एका सॉफ्टवेअरचा वापर केला आहे. हे काम एका कॉल सेंटरवरून झालं आहे. काँग्रेसच्या हार्ड कोअर वोटर बूथवरील मतं डिलीट केली आहेत. असंही राहुल गांधी यांनी सांगितलं. याचबरोबर नावं डिलीट किंवा अॅड करताना त्यांचे पत्ते हे असंबंध आणि रँडम पद्धतीनं देण्यात आले आहेत असा देखील आरोप राहुल गांधी यांनी केला.
निवडणूक आयोगाकडून उत्तरच नाही
या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कर्नाटकातील सीआयडीने १८ महिन्यात १८ पत्र लिहिली आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला काही साधे प्रश्न विचारले. ही मतदार डिलीट करण्याचे आयपी अॅड्रेस द्या. डिव्हाईसची माहिती द्या. मात्र निवडणूक आयोगानं याबाबत कोणतंही उत्तर दिलेलं नाही. असं देखील राहुल गांधी यांनी सांगितलं.
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार हे मत डिलीट करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत असा देखील आरोप केला.
