V Anantha Nageswaran: दीर्घकाळ तेल महाग राहिल्यास अर्थगतीला धोका
नवी दिल्ली : कच्च्या तेलाचे महागडे दर किती काळ राहतात, यावर अर्थगतीला बसणारा फटका अवलंबून असेल. तेलाचे दर 90 डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास राहिल्यास भारत अर्थगती कायम राखेल. मात्र, 100 डॉलर्सवर दर अधिक काळ राहिल्यास देशाच्या अर्थगतीला निश्चित फटका बसेल, असे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी सांगितले.
अर्थ मंत्रालयाच्या स्थायी समितीचा अहवाल मंगळवारी (दि. 17) जाहीर झाला. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये 28 फेब्रुवारी रोजी युद्धाला तोंड फुटले. त्यामुळे तेलाच्या भावाने 100 डॉलर्सचा भाव पार केला. त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीत भारताचे नियोजन काय असेल, यावर नागेश्वरन यांनी भाष्य केले. तसेच, कच्च्या तेलाची किंमत 90, 110 आणि 130 डॉलर्स प्रतिबॅरल झाल्यास त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, याची शक्यताही त्यांनी वर्तविली.
नागेश्वरन म्हणाले, कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळासाठी कशा असतील, यावर अर्थव्यवस्थेवर पडणारा प्रभाव अवलंबून असेल. तेलाच्या किमती काही काळासाठीच 130 डॉलर्स प्रतिबॅलरवर गेल्यास त्याचा फटका बसणार नाही. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये तेलाच्या किमती 90 डॉलर्स प्रतिबॅरल राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरही देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 7 ते 7.4 टक्के राहील.

