पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या सरकारचा आज (दि. १७) पंचकुलामध्ये शपथविधी सोहळा होत आहे. या कार्यक्रमाला भाजप अध्यक्षांसह केंद्रीय मंत्री, प्रमुख नेते, एनडीएचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्यानंतर एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनिती ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीत विरोधकांना घेरण्यासाठी चक्रव्यूह निर्माण करण्यावर चर्चा होणार आहे. तसेच विरोधकांचे खोटे नॅरेटिव्ह उखडून काढण्यासाठी आणि विरोधी पक्षांवर दबाव ठेवण्यासाठी रणनिती आखण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
देशभरात भाजपचे 13 मुख्यमंत्री आणि 16 उपमुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, सिक्कीम, नागालँड आणि मेघालयमध्ये एनडीएचे सरकार असून इतर पक्षांचे मुख्यमंत्री आहेत.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ हे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत, असे भाजपच्या एका निवेदनात म्हटले आहे.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या शपथविधी सोहळ्यात सर्व विरोधी पक्षांचे नेते एकजूट दाखवण्यासाठी श्रीनगरला गेले होते. त्यानंतर एनडीएची एकजूट दाखविण्यासाठी भाजपने ही बैठक बोलावली आहे. एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यांचा समावेश असलेला संरचित अजेंडा असेल. यावेळी 'संविधानाचा अमृत महोत्सव' आणि 'लोकशाही' या विषयांवरही चर्चा होणार आहे.