

पुढारी ऑनलाईन डेस्क : PM Modi Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान एप्रिल महिन्याला सण आणि उत्सवांचा महिना असे संबोधले आणि देशवासीयांना नवरात्रि आणि रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
पीएम मोदी म्हणाले, ‘एप्रिल महिना आध्यात्मिकतेचा, उत्सवांचा आणि सकारात्मकतेचा आहे. नवरात्री हा देवीच्या उपासनेचा काळ आहे, तर रमजान संयम आणि सेवा यांचे प्रतीक आहे. या दोन्ही सणांचे मोठे सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.’
पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना सांस्कृतिक विविधता आणि धार्मिक सौहार्द जपण्याचा संदेश दिला. तसेच, या काळात लोकांनी एकमेकांना मदत करावी, समाजासाठी योगदान द्यावे आणि पर्यावरणपूरक सण साजरे करावेत, असे आवाहन केले.
मोदी म्हणाले, ‘आज या पावन दिवशी मला तुमच्याशी 'मन की बात' करण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा आहे. याच दिवशी चैत्र नवरात्र सुरू होत आहे. तसेच, आजपासून भारतीय नववर्षालाही सुरुवात होत आहे. यंदा विक्रम संवत 2082 प्रारंभ होत आहे.’
यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांचे महत्त्व देशवासीयांना नव्या संकल्पांसह सकारात्मकतेने पुढे जाण्याचे आवाहन केले. तसेच, पर्यावरणपूरक आणि सामाजिक सौहार्द जपणाऱ्या सणांचा संदेशही त्यांनी दिला.
‘मन की बात’ हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केला जातो आणि त्यामध्ये पंतप्रधान विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी विषयांवर देशवासीयांशी संवाद साधतात.