

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कुवेतचे अमिर शेख मेशाल अल-अहमद अल-जबेर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या संवादात दोन्ही नेत्यांनी प्रदेशातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेत शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवण्याच्या गरजेवर भर दिला.
ही चर्चा अशावेळी झाली आहे, जेव्हा जागतिक ऊर्जा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात तणाव कायम आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नौदल निर्बंधांमुळे या मार्गावरील जहाज वाहतुकीवर परिणाम झाला असून जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. भारतासाठी पश्चिम आशियातील स्थैर्याला विशेष महत्त्व आहे. ऊर्जा सुरक्षेपासून ते आखाती देशांतील भारतीय नागरिकांच्या हितसंबंधांपर्यंत अनेक बाबी या प्रदेशाशी निगडित असल्याने भारताने संवाद आणि शांततेचा मार्ग स्वीकारण्यावर पुन्हा एकदा भर दिला आहे. गेल्या काही वर्षांत भारताने कुवेत, सौदी अरेबिया, यूएई, कतार आणि ओमान यांच्याशी संबंध अधिक दृढ केले आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चेत सकारात्मक प्रगती होत असल्याचा दावा केला आहे. अंतिम करार झाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होऊ शकते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तथापि, करार होईपर्यंत निर्बंध कायम राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कुवेतमध्ये सुमारे १० लाखांहून अधिक भारतीय वास्तव्यास असून तेथील सर्वात मोठ्या परदेशी समुदायांपैकी एक आहेत. याशिवाय भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजांचा मोठा भाग आखाती देशांतून पूर्ण होतो. त्यामुळे या प्रदेशातील घडामोडींवर भारत बारकाईने लक्ष ठेवून असून शांतता, संवाद आणि राजनैतिक तोडग्याला सातत्याने पाठिंबा देत आहे. भारताने कोणत्याही संघर्षात पक्ष न घेता संवाद, शांतता आणि राजनैतिक तोडग्याचा सातत्याने पुरस्कार केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत कुवेतच्या सार्वभौमत्व आणि भौगोलिक अखंडतेवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध असल्याचे स्पष्ट केले. तसेच परिस्थिती सामान्य करण्यासाठी संवाद, राजनैतिक प्रयत्न आणि तणाव कमी करण्याचा मार्गच सर्वाधिक परिणामकारक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या चर्चेदरम्यान मोदी यांनी कुवेतमध्ये वास्तव्यास असलेल्या मोठ्या भारतीय समुदायाच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी अमिर यांनी घेतलेल्या वैयक्तिक पुढाकाराबद्दल त्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक घडामोडींवर सातत्याने संवाद सुरू ठेवण्याचेही मान्य केले.