पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता 'मन की बात' कार्यक्रमात जनतेशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी अवकाश जगताशी संबंधित तरुणांशी संवाद साधला.
रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा 113 वा भाग आहे. यापूर्वी 28 जुलै रोजी 'मन की बात'ची 112 वी आवृत्ती प्रसारित झाली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी पॅरिस ऑलिम्पिक, मॅथ्स ऑलिम्पियाड, आसाम मोइदम, टायगर डे, जंगलांचे संवर्धन आणि स्वातंत्र्य दिन या विषयांवर भाष्य केले.
नॅशनल स्पेस डे आणि चांद्रयान-३ बद्दलही ते बोलले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, 21 व्या शतकात भारतात अनेक गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे विकसित भारताचा पाया मजबूत होत आहे. उदाहरणार्थ, या 23 ऑगस्टलाच आपण सर्व देशवासीयांनी पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केला. गेल्या वर्षी या दिवशी चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिणेकडील शिव-शक्ती बिंदूवर यशस्वीरित्या उतरले होते. ही गौरवशाली कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला, असेही ते म्हणाले.
22 भारतीय भाषा आणि 29 बोलींव्यतिरिक्त, मन की बात 11 परदेशी भाषांमध्येही प्रसारित केली जाते. यामध्ये फ्रेंच, चायनीज, इंडोनेशियन, तिबेटी, बर्मी, बलोची, अरबी, पश्तू, पर्शियन, दारी आणि स्वाहिली यांचा समावेश आहे. 'मन की बात' ऑल इंडिया रेडिओच्या 500 हून अधिक स्टेशन्सद्वारे प्रसारित केली जाते. 'मन की बात' चा पहिला कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाला.
पीएम मोदी म्हणाले की, या वर्षी मी लाल किल्ल्यावरून एक लाख तरुणांशी संवाद साधला. यावेळी तरूणांना मी राजकीय व्यवस्थेशी जोडण्याचा कौल दिला असता, मला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावरून लक्षात येते की, आपले तरुण किती मोठ्या संख्येने राजकारणात येण्यास इच्छुक आहेत. ते फक्त योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शनाच्या शोधात असतात.
ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यातही राजकीय पार्श्वभूमी नसलेले समाजातील प्रत्येक घटकातील अनेक लोक पुढे आले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आज पुन्हा एकदा त्याच आत्म्याची गरज आहे. मी माझ्या सर्व तरुण मित्रांना या मोहिमेत नक्की सहभागी होण्यासाठी सांगेन.