

पुढारी ऑनलाईन डेस्क : २२ एप्रिलला जम्मू काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २६ लोकांचा जीव गेला आहे. जगभरातील माध्यमांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. सर्वच माध्यमांमध्ये या दहशतवादी हल्ल्याबाबत वार्तांकन करताना संबधितांना दहशत वादी (Terrorist) असे संबोधले आहे. पण बीबीसीने आपल्या वार्तांकनांत अतिरेकी (Militans) असा शब्द वापरला आहे. या शब्दावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे वार्तांकन करण्यासाठी ‘बीबीसी’ Militans शब्द वापरत होती. पण केंद्राने बीबीसीला पत्र लिहून militans (अतिरेकी) शब्दाऐवजी Terrorist (दहशतवादी) शब्द वापरावा अशी सूचना केली आहे.
केंद्र सरकारने बीबीसी इंडीयाचे प्रमुख जॅकी मार्टिन यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही बीबीबीचे वार्तांकन यापूढे तपासून पाहू असेही केंद्रान म्हटले आहे.
आजच दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत १६ पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. हे चॅनेल व भारताविषयी चुकीची माहिती पसरवत आहेत. याची दखल घेत केंद्र सरकारने हे कडक पाऊल उचलेले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने पाकिस्तानच्या बंदी घातलेल्या त्या १६ चॅनेलची लिस्ट जारी केली आहे. गृहमंत्रालयाच्या शिफारशीवरून डॉन न्यूज (Dawn News), सामा टीव्ही (Samaa TV), एआरवाय न्यूज (ARY News), जिओ न्यूज (Geo News) यासह अन्य चॅनेल्सवर ही बंदी लागू करण्यात आली आहे.
यामध्ये माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनेलचा देखील समावेश आहे.
अतिरेकी (Militans)म्हणजे अशा लोकांचा गट जो सरकारविरोधी किंवा सामाजिक संरचनेविरुद्ध हिंसक मार्गाने बंड पुकारतो. असे लोक त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी ते हिंसाचाराचा वापर करतात. यामध्ये उग्रवादी चळवळींचाही समावेश होतो.
तर दहशतवादी (Terrorist) म्हणजे अशी व्यक्ती किंवा समूह, जे सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी हिंसक घटना घडवतात. हिंसक घटना घडवून आणून समाजामध्ये भीती पसरवून, मानसिक धक्का देऊन, सरकारवर दबाव आणला जातो.
बहूतांश वेळा दहशतवादी हे बाह्य शक्तींच्या आर्थिक पाठबळावर काम करत असतात.