नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी (parliament winter session) पडलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासह इतर मागण्यांवरून विरोधी पक्षांनी सलग तिसर्या दिवशी लोकसभेत प्रचंड गदारोळ केला. गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तास वाया गेला. मात्र, त्यानंतर शून्य प्रहर तसेच उर्वरित कामकाज सुरळीतपणे पार पडले. प्रश्नकाळात फलक दाखविणार्या विरोधी खासदारांची अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कानउघाडणी केली. 'विरोध करण्याची ही काही पद्धत नाही,' असे अध्यक्षांनी विरोधकांना सुनावले.
सदनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मृत शेतकर्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी 'आम्हाला न्याय द्या,' अशी घोषणाबाजी विरोधी खासदार करीत होते. सरकारचा निषेध करत गदारोळातच काँग्रेस आणि द्रमुकच्या खासदारांनी सभात्याग केला. यावेळी शेतमालाला एमएसपी देण्यासाठी कायदा करावा, अशी मागणीही विरोधक करीत होते.
समान नागरी कायद्याची मागणी (parliament winter session)
शून्य प्रहरात भाजपचे सदस्य निशिकांत दुबे यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, असे अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर देशाची स्थिती पाहता लवकरात लवकर हा कायदा लागू करावा, असे दुबे यांनी सांगितले.
असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी सुधारणा विधेयक मंजूर
लोकसभेत दुपारच्या सत्रात असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी हे विधेयक सादर केले. हे विधेयक भेदभाव करणारे असून, त्याला आमचा विरोध आहे, असे काँग्रेसचे सदस्य कार्ती चिदम्बरम यांनी सांगितले.
जया बच्चन यांच्याकडून संसद परिसरात चॉकलेट वाटप
नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी संसद परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनाला बसलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांना चॉकलेट आणि बिस्किटांचे वाटप केले. जया बच्चन यांनी 12 खासदारांचे निलंबन केल्याबद्दल निषेध केला.
खासदारांच्या प्रकृतीची काळजी म्हणून चॉकलेट आणि बिस्किटांचे वाटप केले असल्याचे जया बच्चन यांनी सांगितले.