विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी 'हिंदू' शब्द वापरुन केलेल्या विधानावरुन लोकसभेत आज (दि.१ जुलै) प्रचंड गदारोळ झाला. खुद्द पंतप्रधान मोदींनी राहुल यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसाचाराशी जोडणे योग्य नाही, असे ठणकावले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले. या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
लोकसभेत सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, "जे स्वत:ला हिंदू म्हणवतात त्यांना चोवीस तास हिंसाचार, हिंसाचार, हिंसाचार हवा असतो; द्वेष आणि खोटे,बोलत राहा. ते मुळीच हिंदू नाहीत. सत्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे. सत्यापासून मागे हटता कामा नये. अहिंसेचा प्रसार झाला पाहिजे."
राहुल गांधींनी हिंदू धर्म असा शब्द वापरुन केलेल्या विधानावर पंतप्रधान नरेंद मोदी उठून राहुल गांधींना रोखले. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यावर राहुल म्हणाले की, मी भाजपला हिंसक म्हटले, नरेंद्र मोदी म्हणजे हा संपूर्ण हिंदू समाज नाही. भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही. आरएसएस हा संपूर्ण हिंदू समाज नाही, असा दावाही त्यांनी केला. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, " भारतीय संविधानाने मला शिकवले आहे की, मी विरोधी पक्ष नेत्याला गांभीर्याने घेतले पाहिजे."
राहुल गांधींच्या वक्तव्याचा पलटवार करत अमित शहा म्हणाले की, "जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, हिंसेची भाषा करतात, करोडो लोकांना माहित नाही स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने या धर्माला हिंसाचाराशी जोडले आहे. मला राहुल गांधी यांना एक विनंतीही करायची आहे की, त्यांनी एकदा इस्लाममधील अभ्यासकांचे मत घ्यावे. गुरु नानक साहिब यांच्या अभयमुद्रेवर त्यांनी मत घ्यावे. जेव्हा वैचारिक दहशत होती तेव्हा त्यांनी संपूर्ण देशाला घाबरवले होते."