

Pahalgam terror attack
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे शेजारील देशही सतर्क झाले आहेत. हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, शनिवारी श्रीलंकेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यातील संशयित असल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी कोलंबो येथे चेन्नईहून येणाऱ्या विमानाची कसून तपासणी केली.
विमानतळ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, श्रीलंकेच्या एअरलाइन्सच्या विमानात पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित लश्कर-ए-तोयबाचे पाच संशयित दहशतवादी असू शकतात, अशी शक्यता भारतीय अधिकार्यांनी कोलंबो विमानतळ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. चेन्नई एरिया कंट्रोलकडून अलर्ट मिळाला होता. माहिती मिळताच विमान तपासासाठीची परवानगी देण्यात आली. श्रीलंकेच्या एअरलाइन्सने शनिवारी सकाळी ११.५९ वाजता बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे विमान UL १२२ उतरवले. यानंतर श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी कोलंबो येथे चेन्नईहून येणाऱ्या विमानात शोध मोहीम राबवली.
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये चार दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांचीहत्या केली होती. या हल्ल्यानंतर भारताने विविध निर्बंधाने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देशांमधील तणावात वाढ झाली आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे, जे अद्याप सापडलेले नाहीत. दंडात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून, भारताने पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंदी घातली आहे, व्हिसा रद्द केला आहे, राजनैतिक संबंध पूर्णपणे संपुष्टात आणले आहेत.
भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जारी केली आदेशात म्हटले की, पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. पुढील सूचना येईपर्यंत हा निर्णय लागू राहील. या निर्णयामुळे पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या सर्व वस्तूंची आयात पूर्णपणे थांबेल. एप्रिल-जानेवारी २०२४-२५ पर्यंत मध्ये भारताची पाकिस्तानला होणारी निर्यात ४४७.६५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती. तर पाकिस्तानातून केलेली आयात ०.४२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती. भारत पाकिस्तानातून बियाणे, खजूर, अंजीर यासारख्या वस्तू आयात करतो. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या (डीजीएफटी) अधिसूचनेनुसार, या बंदीतील कोणत्याही अपवादासाठी सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल.