Rajnath Singh : ऑपरेशन सिंदूर दहशतवादाला चोख प्रत्युत्तर : चीनमधील बैठकीत संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
Rajnath Singh In China
काही देश आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून सीमापार दहशतवादाचा वापर करतात व दहशतवाद्यांना आश्रय देतात. अशा दुहेऱ्या भूमिकांसाठी जागतिक समुदायात कोणतेही स्थान नसावे. शांघाय सहकार्य संघटनेने( एससीओ) अशा देशांना कठोर शब्दांत टीका करण्यास मागे हटता कामा नये, असे आवाहन करत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'चा पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादाला भारताने दिलेले प्रत्युत्तर होते, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (दि. २६ जून) स्पष्ट केले. चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
सर्व समस्यांचे मूळ दहशतवाद
"आपल्या क्षेत्रासमोरील सर्वात मोठी आव्हाने म्हणजे शांतता, सुरक्षा आणि परस्परविश्वासाचा अभाव आहे. या समस्यांच्या मुळाशी दहशतवाद, अतिरेकी प्रवृत्ती आणि धर्मांधतेचे वाढते प्रमाण हे आहे. दहशतवाद व महासंहारक शस्त्रांचा गैरराज्य घटकांच्या व दहशतवादी संघटनांच्या हाती होणारा प्रसार यांच्यासह शांतता व समृद्धीचा सहअस्तित्व शक्य नाही. या आव्हानांना तोंड देण्यासाठी ठोस कृती आवश्यक असून आपण सर्वांनी एकत्र येऊन या विकृतींचा निर्णायक मुकाबला केला पाहिजे,” असे आवाहन यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
जागतिकीकरणाची प्रक्रिया आता मंदावलीय
“कधी काळी जगाला एकत्र आणणारी जागतिकीकरणाची प्रक्रिया आता मंदावली आहे. आज जगासमोर शांतता, सुरक्षिततेबरोबर कोरोना महामारीनंतरच्या आर्थिक पुनर्बांधणीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे देशांदरम्यानच्या संघर्षांना टाळण्यासाठी संवाद व सहकार्य हेच देशादेशांमधील संबंध वृद्धिंगत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा भारताचा ठाम विश्वास असल्याचेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
सर्वे जना: सुखिनो भवन्तु...
कोणतेही राष्ट्र कितीही मोठे व सामर्थ्यशाली असले तरी एकटे काहीच साध्य करू शकत नाही. जागतिक व्यवस्था किंवा बहुपक्षीयतेची कल्पना राष्ट्रांनी परस्पर सहकार्याने, परस्परसंबंधांतून सामूहिक कल्याण साध्य करते. ही संकल्पना 'सर्वे जना: सुखिनो भवन्तु' या भारताच्या प्राचीन संस्कृत म्हणीचे प्रतिबिंबही आहे. ज्याचा अर्थ सर्वांच्या शांततेचा व समृद्धीचा आशय दर्शवतो, असेही यावेळी राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
चीन-भारत लष्करी हॉटलाइन पुन्हा सुरू करण्यावर होणार चर्चा
चीनमधील छिंगदाओ दोन दिवसांच्या 'एससीओ' संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह सहभागी झाले आहेत. २०२० मध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केंद्रुीय मंत्रिमंडळातील एखाद्या वरिष्ठ मंत्र्याचा हा पहिलाच चीन दौरा आहे. त्यामुळे या दौर्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आज एससीओ बैठक सुरु होण्यापूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जुन यांच्यासह पाकिस्तान, इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान संरक्षण मंत्री एका सामूहिक छायाचित्रासाठी एकत्र आले. या बैठकीव्यतिरिक्त राजनाथ सिंह हे एससीओ शिखर परिषदेच्या निमित्ताने चीनचे संरक्षण मंत्री डोंग जुन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत चीन-भारत लष्करी हॉटलाइन पुन्हा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे.

