

Operation Sindoor is ongoing Central minister Kiren Rijiju said after All Party Meet
नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदून राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले.
यात 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली. दरम्यान, या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू आहे, असे स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या कारवाईनंतर केंद्र सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावून विविध राजकीय पक्षांना या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली.
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करून त्यांचा पूर्ण नायनाट केला, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना बुधवारी सकाळी झालेल्या सैनिकी कारवाईची माहिती देण्यात आली. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली.
रिजिजू म्हणाले, “सर्व नेत्यांनी परिपक्वता दाखवत सरकारला पाठिंबा दिला आहे. सर्वपक्षीय बैठक ही एकजुटीचे प्रतिक ठरली. सर्व पक्षांनी ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन केले आणि या कारवाईस पाठिंबा दिला.”
त्यांनी यावेळी हेही स्पष्ट केले की, ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने तांत्रिक तपशील किंवा पुढील टप्प्यांची माहिती सध्या उघड केली जाणार नाही. “हे सुरू असलेले ऑपरेशन असल्यामुळे, अधिकाऱ्यांना बैठकीस बोलावले गेले नाही,” असेही रिजिजूंनी स्पष्ट केले.
“देशात व देशाबाहेरून अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी आणि नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा,” असे आवाहन रिजिजूंनी केले.
AIMIM अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले, “सरकारकडे पाकिस्तानला सामोरे जाण्याची आणि काश्मिरी जनतेला जवळ घेण्याची सुवर्णसंधी आहे.”
त्यांनी पुढे सुचवले की, “पुंछ हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना ‘दहशतवाद पीडित’ म्हणून घोषित केले जावे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी घर व आर्थिक मदत द्यावी.”
“या कारवाईत भावलपूर आणि मुरिदके हे दोन प्रमुख दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, हे महत्त्वाचे यश आहे,” असेही ओवैसी यांनी नमूद केले. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी बठिंडामध्ये राफेल कोसळल्याचा दावा केला असून, भारतीय हवाई दलाने या अफवांचे त्वरित खंडन करावे, असेही ते म्हणाले.
ही कारवाई जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि PoK मधील अंतर्गत भागांमधील दहशतवादी छावण्यांवर सकाळी जोरदार हल्ले चढवले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये बुधवारी पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यात आले आणि त्यामध्ये 100 दहशतवादी ठार करण्यात आले.