

Operation Sindoor: India neither forgets nor forgives – Air Force’s stern warning to the enemy
पुढारी ऑनलाईन :
ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भारतीय वायुसेनेने ‘ना विसरण्याचा, ना माफ करण्याचा’ निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. पंतप्रधानांच्या राष्ट्रीय संकल्पासोबत भारतीय सैन्याने स्पष्ट केले की, दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना शोधून पाताळातूनही बाहेर काढले जाईल.
मे २०२५ मध्ये सीमापार दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या ऐतिहासिक लष्करी कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’ला आज एक वर्ष पूर्ण झाले. या विशेष प्रसंगी भारतीय वायुसेना आणि भारतीय सैन्याने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत जगाला आणि विशेषतः शत्रूराष्ट्रांना स्पष्ट संदेश दिला की, नवा भारत आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.
वायुसेनेने आपल्या अधिकृत संदेशात कठोर शब्दांत म्हटले आहे की, “भारत काहीही विसरत नाही आणि कोणालाही माफ करत नाही.” हे विधान भारताने दहशतवादाविरोधात स्वीकारलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा पुनरुच्चार मानले जात आहे.
पंतप्रधानांचा राष्ट्रीय संकल्प : ओळखूही आणि संपवूही
भारतीय सैन्याने प्रसिद्ध केलेल्या या विशेष व्हिडीओची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक भाषणाने होते. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान म्हणताना दिसतात की, भारत दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांची ओळख पटवेल, त्यांना शोधून काढेल आणि त्यांचा पूर्णतः खात्मा करेल.
सरकारने याला केवळ वक्तव्य नसून राष्ट्रीय संकल्प असे म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापनदिनी हा व्हिडीओ आपल्या जवानांच्या शौर्याला सलाम करतो, तसेच भारताकडे आता शत्रूच्या घरात घुसून कारवाई करण्याची क्षमता आणि राजकीय इच्छाशक्ती दोन्ही असल्याची जाणीव करून देतो.
नेमकी कारवाई : काय होते ऑपरेशन सिंदूर?
वायुसेनेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कारवाई अचूक, आठवणींमध्ये कायमस्वरूपी – ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे.” गेल्या वर्षी मे महिन्यात भारतीय जवानांनी गुप्त माहितीच्या आधारे सीमापार कार्यरत दहशतवादी लॉन्च पॅड्स आणि त्यांच्या सूत्रधारांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते.
या मोहिमेची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे तिची ‘सर्जिकल प्रिसिजन’ अर्थात अचूकता होती. कोणतेही अतिरिक्त नुकसान न करता फक्त ठरावीक लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. एक वर्षानंतरही हे ऑपरेशन भारतीय लष्करी इतिहासातील असे पर्व मानले जात आहे, ज्यामुळे दक्षिण आशियातील सुरक्षा समीकरण कायमचे बदलले.