

Bureau of Civil Aviation Security Advisory Passengers Indian Airports
नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण दलाने पाकिस्तानमध्ये घुसून 'ऑपरेशन सिंदूर' राबवल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तानी सैन्याने जम्मूच्या एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताच्या हवाई दलाने हा प्रयत्न हाणून पाडला असला तरी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (Bureau of Civil Aviation Security) विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी चेक इन आणि इतर प्रक्रियेसाठी तीन तास अगोदर विमानतळावर पोहोचावे अशा सूचना विमान कंपन्यांनी प्रवाशांना केल्या आहेत.
पहलगाममध्ये पर्यटक महिलांचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर भारतीय सैन्याने 7 एप्रिलला मध्यरात्री पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला. 25 मिनिटांत दहशतवाद्यांचे ९ तळ भारतीय सैन्याने उखडून फेकले आणि किमान 100 दहशतवादी जागीच ठार केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमा रेषेवर कुपारती सुरू केल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेच. इतकंच नव्हे तर गुरुवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मूतील एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला. पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलाने पाडले आहेत.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (Bureau of Civil Aviation Security) देशभरातील विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि अन्य विमान कंपन्यांनी प्रवाशांना सूचना दिल्या आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रवाशांनी चेक इन आणि अन्य प्रक्रियेसाठी तीन तास अगोदर विमानतळावर पोहोचावे. तसेच चेक इन हे डिपार्चर म्हणजेच उड्डाणाच्या वेळेच्या 75 मिनिटांपूर्वी बंद केले जाईल, असे एअर इंडियाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
अलास्का एअरलाईन्सनेही X वर पोस्ट टाकली आहे. प्रवाशांना चेक इनमध्ये फक्त ७ किलो वजनाची एकच बॅग नेता येणार आहे. तसेच विमानतळावर प्रवाशांना सरकारी ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. टर्मिनल इमारतीत प्रवाशांना सोडायला येणाऱ्या नातेवाईकांना प्रवेश दिला जाणार नाहीये.
अफवांवर विश्वास ठेवू नका
भारत सरकारने सर्व विमानतळांवर प्रवेशबंदी जारी केल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यात कोणतेही तथ्य नसून प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.