

पुढारी ऑनलाईन डेस्क : दहीभातातून मुलांना विष घालून त्यांची आईने हत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातून समोर आली आहे. तिने स्वत:ही विष कालवलेला दहीभात खाल्ला असून तिची प्रकृती गंभीर आहे. संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूरमधील राघवेंद्र नगरात गुरूवारी (दि.२७) रात्री ही घटना घडली.
अमीनपूरमधील राघवेंद्र नगर कॉलनीत राहणाऱ्या रजिताने गुरूवारी रात्री आपल्या तिन्ही मुलांना विष कालवलेला दहीभात खायला दिला. त्यानंतर तिनेही तोच दही भात खाल्ला. त्यानंतर तिन्ही मुले झोपी गेली. झोपेतच साई कृष्णा (वय १२), मधुप्रिया (१०) व गौतम (वय ८) या तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कामावरून पती चेन्नईय्या हे घरी आल्यानंतर रजिताला पोटात तीव्र वेदना होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र मुलांचा झोपेतच दुर्दैवी मृत्यू झाला. रजिताची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन मुलांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला असून तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही घटना कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून रजिताच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राघवेंद्रनगर कॉलनीतील नागरिकांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.